2002 दंगलप्रकरणी एसआयटीचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2002 च्या गुजरात दंगलीनंतर कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याचा कट रचला होता. सोनिया गांधी यांचे सचिव अहमद पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड यांनी 30 लाख रुपये घेतले होते, असा दावा एसआयटीने केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. तथापि, काँग्रेस नेत्यांनी प्रतिज्ञापत्रातील हे दावे खोडून काढत अहमद पटेल आणि सोनिया गांधी यांचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गुजरात दंगलीतील तिस्टाच्या भूमिकेची चौकशी करणाऱया एसआयटीने अहमदाबाद सत्र न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही नवीन दावे करण्यात आले आहेत. गुजरातचे तत्कालीन डीजीपी आर. बी. श्रीकुमार आणि माजी आयपीएस संजीव भट्ट यांचाही तिस्तासोबत गुजरात सरकारविरोधातील कटात सहभाग होता. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अस्थिर करण्याचा कट या लोकांनी रचला होता, असे एसआयटीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
गुजरात एसआयटीने 25 जून रोजी तिस्ताला तिच्या मुंबईतील घरातून अटक केली होती. गुजरात दंगलीत कट रचल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली होती. तिस्ता सेटलवाड यांना अहमद पटेल यांच्याकडून एकदा 5 लाख रुपये आणि दुसऱयांदा 25 लाख रुपये मिळाले होते. तुरुंगात असलेल्या तिस्ताच्या जामीन अर्जालाही एसआयटीने विरोध केला आहे.
एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तिस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. अहमदाबाद येथील शाहीबागमधील सर्किट हाऊसमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत अहमद पटेल यांनी सेटलवाड यांना 25 लाख रुपये दिले. त्याआधी झालेल्या एका बैठकीत पाच लाख रुपये देण्यात आले होते. हा निधी गुजरात मदतकार्याच्या नावाने घेण्यात आला होता. या बैठकीत काही राजकीय नेते उपस्थित होते. त्याशिवाय, गुजरातमध्ये गोध्रा येथील रेल्वेजळीत कांड घडल्यानंतर सेटलवाड यांनी एका आठवडय़ात मदत शिबिराचा दौरा केला आणि राजकीय नेत्यांसोबत बैठका घेतल्या. दंगलीच्या चार महिन्यानंतर गुप्त पद्धतीने त्यांनी तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्टसोबत अहमद पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली, असे दावे करण्यात आले आहेत.
राजकीय फैरी सुरू
एसआयटीच्या या खुलाशानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. गुजरात दंगलीत काँग्रेसने नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा ज्याप्रकारे कट रचला होता, त्याचे सत्य बाहेर येत आहे. तीस्ता सेटलवाड आणि त्यांचे साथीदार मानवतेच्या अंतर्गत काम करत नव्हते. ते राजकीय हेतूने काम करत होते, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुजरातचे तत्कालीन सरकार अस्थिर करण्याचे आणि निरपराध लोकांना त्यात गोवण्याचे काँग्रेसचे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी पुढे केला.
अहमद पटेल यांच्या कन्येचे स्पष्टीकरण
याप्रकरणी अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल यांनी या आरोपांमागे ‘निवडणूक कनेक्शन’ असल्याचे स्पष्ट केले. गुजरात निवडणुकीपूर्वी असे आरोप अपेक्षितच होते. या प्रकरणाला आता 20 वर्षे झाली आहेत. माझे वडील हयात असताना कारवाई का झाली नाही? निवडणुकीमुळे असे आरोप होत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून माझ्या वडिलांची बदनामी होत आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी काही ना काही मुद्दा उपस्थित केला जातो, असे त्या पुढे म्हणाल्या.
भाजप मृतांनाही सोडत नाही ः काँग्रेस
काँग्रेसने भाजपचे आरोप ठामपणे फेटाळले आहेत. भाजप मृतांनाही सोडत नसल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले. 2002 मधील जातीय नरसंहार रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी दाखविलेल्या अनास्थेमुळेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी यांनी त्यांना राजधर्माची आठवण करून दिली. पंतप्रधानांचे राजकीय सूडबुद्धीचे यंत्र त्यांचे विरोधक असलेल्यांना सोडत नाही, असा टोला त्यांनी मारला.