उत्तराखंडमध्ये 26 दिवसांत रेल्वे भुयार तयार ः 4,200 कोटींचा प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण होणार
वृत्तसंस्था / देहरादून
देवभूमी उत्तराखंडमध्ये रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल)च्या रेल्वे प्रोजेक्ट-2 अंतर्गत ऋषिकेशपासून कर्णप्रयागपर्यंत रेल्वेमार्ग निर्मितीच्या कामाने वेग पकडला आहे. 4,200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात शिवपुरीपासून व्यासीदरम्यान 1 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम केवळ 26 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. इतक्या कमी वेळेत बोगद्याचे काम पूर्ण करणे एक नवा विक्रम आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात रेल्वे संपर्कयंत्रणेच्या क्षेत्रात वेगाने काम झाले आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण होताच ऋषिकेश आणि कर्णप्रयाग मधील प्रवासाचा कालावधी 7 तासांवरून कमी होत 2 तासांवर येणार असल्याचे उद्गार धामी यांनी काढले आहेत.
उत्तराखंडसाठीचा हा प्रकल्प केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात घोषित केला होता. पर्यटकांच्या सुविधेसाठी ऋषिकेशपासून कर्णप्रयागपर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येणार आहे. 125 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो ही कंपनी पूर्ण करत आहे. प्रकल्पात रेल्वेमार्गावर 12 नवी रेल्वेस्थानके, 17 भुयारे असतील, हा प्रकल्प पूर्ण होताच उत्तराखंडमधील पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून देखरेख
या प्रकल्पाच्या कार्यावर मुख्यमंत्री धामी देखरेख ठेवून आहेत. पर्वतीय क्षेत्रांमध्ये हा रेल्वेमर्गा निर्माण करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 125 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाच्या अंतर्गत देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गौचर, देहरादून, टिहरी गढवाल, पौडी गढवाल, चमोली आणि कर्णप्रयाग जिल्हय़ांना परस्परांशी जोडले जाणार आहे.