कोल्हापूर प्रतिनिधी
स्वर्गीय राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन काळात कोल्हापूर विमानतळाची निर्मिती झाली. या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आपण कटीबध्द असून येत्या मार्चपर्यंत नवीन अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिले.
नक्की वाचा >>> शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट आज सुरू; विविध कलांचे आणि खाद्यपदार्थांची पर्वणी
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअरच्यावतीने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर या आठवड्यातील तीन दिवस (मंगळ/गुरु/शनि) सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे फ्लॅग ऑफ दाखवून आजपासून करण्यात आला. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अपर सचिव उषा पहाडी, स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरनसिंग तिवाना आदी दूरदृष्यप्रणालीव्दारे तर कोल्हापूर विमानतळ येथे छोटेखानी झालेल्या समारंभासाठी छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खा. धनंजय महाडीक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. हसन मुश्रीफ, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ.प्रकाश आवाडे, आ. ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे सर्वेसर्वा डॉ. संजय पाटील, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, स्टार एअरचे चेअरमन संजय घोडावत, संचालक श्रेणिक घोडावत आदी उपस्थित होते.
श्री. सिंधिया म्हणाले, या विमातळामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी तसेच इतर बाबींना चालना मिळून कोल्हापुरचा विकास होण्यास मदत होईल. या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे व्हावीत यासाठी आपले मंत्रालय कार्य करेल, तर कोल्हापूर येथील हे विमानतळ देशातील एक महत्वाचे विमानतळ म्हणून नावारुपाला येईल असा आशावाद राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केला.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या विमान सेवेत सातत्य रहावे. त्याचबरोबर मोठ्या अपेक्षेने सुरु झालेली ही विमानसेवा टिकविण्याची जबाबदारी कोल्हापूरवासियांची आहे. या विमानतळावरुन केवळ कोल्हापूर-मुंबई परत कोल्हापूर अशी सेवा सुरु न राहता आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर या विमानतळाच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी शासनाकडून जे जे शक्य आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी खा. सर्वश्री महाडीक, मंडलिक, माने तसेच आ. मुश्रीफ यांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. स्टार एअरचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी प्रास्ताविकात स्टार एअरची कनेक्टीव्हीटी देशातील प्रमुख 19 शहरांशी असल्याचे सांगितले. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरु करण्याला स्टार एअर प्राधान्य देणार असल्याचे सांगून कोल्हापूरच्या विकासाकरिता स्टार उद्योग समूह सर्वोतोपरी योगदान देणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली. या विमानसेवेला दिल्लीतून श्री. सिंधिया यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे तर कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्षरित्या बोर्डींग पास दिले. शेवटी आभार श्रेणिक शहा यांनी मानले.