दै. तरुण भारतच्या वृत्ताची दखल
प्रतिनिधी/गडहिंग्लज
हिरण्यकेशी नदीवर नांगनूर शेजारी दीड किलोमीटरच्या अंतरात कर्नाटक शासनाचे एकूण तीन बंधारे आहेत. जुना गोटूर बंधारा जीर्ण झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी कर्नाटक शासनाच्या पाटबंधारे विभागाने दोन कोटी रुपये खर्चून जुन्याच बंधार्या शेजारी नवा बंधारा बांधला होता. नवा आणि जुन्या बंधाऱ्यांमुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन नांगनूर, खणदाळ, हिटणी येथील शेती व घरांचे प्रचंड नुकसान होत होते. गेल्या दोन वर्षांपासून हा बंधारा हटविण्याची ग्रामस्थांची मागणी होती. अखेर बंधारा हटविण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे होणार्या नुकसानीच्या संदर्भात दै. ‘तरुण भारत’ने वारंवार आवाज उठवला होता. बंधारा हटविण्याची गरज मांडली होती. त्याची दखल अखेर कर्नाटक पाटबंधारे खात्याने घेतली आहे.
सलग दोन बंधाऱ्यांमुळे हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचा फुगवटा होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. त्यामुळे कर्नाटक शासनाने तातडीने जुना बंधारा पाडावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्यांकडून होत होती. बंधारा हटविण्याच्या कामाला आज सुरुवात झाल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. बंधारा हटवण्यासाठी कर्नाटकचे मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आज बंधारा हटवण्याच्या कामाचा शुभारंभ हिरण्यकेशी कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी हिरण्यकेशी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. आर. साठे, व्ही. एम. बेल्लद, उपसरपंच विकास मोकाशी, राजेंद्र मोकाशी, प्रकाश नार्वेकर, संजय मोकाशी, भिमा रेडेकर, दीपक मोकाशी, विनोद मोकाशी, किसान संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ६ जूनपर्यंत बंधारा हटविण्याचे काम पूर्ण होईल असे कर्नाटक पाटबंधारे अधिकार्यांनी सांगितले आहे.