प्रतिनिधी /बेळगाव
महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता वीजबिलातही मोठी वाढ झाली आहे. हेस्कॉमने एप्रिल महिन्यापासून वाढविलेल्या दरामुळे वीजबिलात वाढ झाली आहे. सरासरी 100 ते 500 रुपये प्रत्येक बिलात वाढ झाली असल्याने वीजग्राहक हैराण झाले आहेत. त्यामुळे या वाढत्या महागाईचा कसा सामना करावा याचा विचार ग्राहक करीत आहेत.
एक एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक युनिटमागे तसेच फिक्स चार्जिंसमध्येही वाढ झाल्याने वीजबिलात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळय़ात विजेच्या मागणीत वाढ झाली असताना त्यातच दरवाढ झाल्याने भरमसाट बिल आले आहे. घरगुतीसह औद्योगिक क्षेत्रातही विजेचे बिल वाढले आहे.
उद्योग क्षेत्रालाही दणका
कोरोनामुळे अद्याप उद्योगधंदे पूर्वपदावर आलेले नाहीत. यामुळे उद्योग क्षेत्राला आर्थिक घडी बसविणे कठीण होत आहे. युपेन-रशिया युद्धामुळे लोखंड व पीग आयर्न यांच्या किमती गगनाला भिडल्या असतानाच आता विद्युत बिलात मोठी वाढ झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा दणका बसला. बेळगावमध्ये लघुउद्योजकांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे.