अध्याय सत्रावा
भगवंत उद्धवाला वर्णाश्रम व्यवस्था समजावून देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे विहित कर्तव्यकर्म कोणते ते समजून येईल. त्याप्रमाणे जो वागेल त्याचा निश्चित उद्धार होतो. ब्राह्मण आदिकरून चारही वर्ण आणि त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे लक्षण स्वतः श्रीकृष्ण पुढे सांगतात. ते म्हणाले, शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मणवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. ब्राह्मणांच्या स्वभावात दहा लक्षणे असतात. त्याचे वर्णन मी तुला सांगतो लक्ष देऊन श्रवण कर. मन आदिकरून ज्ञानेंद्रियांचा कल बाह्य गोष्टींनी भुलून जाण्याकडेच असतो. त्यांना विवेकाने आवरून आत्मस्वरूपात स्थिर करावे लागते. आता तशी वृत्ती सावरून धरणे म्हणजे कृष्णसर्पाचे तोंड आवळून धरण्याप्रमाणेच आहे. तो घातलेले वेढे आपोआपच सोडू लागेपर्यंत त्याचे तोंड आवळत रहावे लागते. त्याप्रमाणे वैराग्याच्या सामर्थ्याने आणि गुरुवचनाच्या विश्वासाने आत्मस्वरूपात ऐक्मय होईपर्यंत आंतरवृत्तीत स्थिर असावे लागते. गुरुवचन हेच मुख्य धरून त्यातच बुद्धीला निमग्न करून सोडणे आणि मनालाही तल्लीन करणे ह्याचेच नांव ‘शम’ हे लक्षात ठेव. ब्राह्मणाच्या प्रकृतीमध्ये हा गुण स्वभावसिद्धच असतो. आता दमाचे निरूपण ऐक. विषयप्रकृती बलवत्तर असते आणि कर्मेंद्रियांचे बंड दांडगे असते ह्याकरिता शास्त्रविधीने त्यांचे तोंड ठेचून त्यांना सैरावैरा भडकू देऊ नये.
वेदविधीच्या द्वारे देहाच्या निर्वाहापुरते इंद्रियांना जेवणखाण द्यावयाचे, हा ‘दमगुण’ होय. त्यांत ‘शम’ हा मुख्य राजा आहे व ‘दम’ वगैरे त्याच्या प्रजा आहेत असे समजावे. हे दोन्ही यथायोग्य रीतीने तुला सांगितले. आता तिसरा जो ‘तपोनियम’ तोही ऐक. शमाने ज्ञानेंद्रियांना शांति आणि दमाने कर्मेद्रियांना शांती प्राप्त होते. यानंतर म्हणजे शमदमानंतर वेदोक्त कर्म करणे फारच प्रशंसनीय होय. व्रतादिकांच्या योगाने शरीरशोषण करणे ह्याचे नांव ‘तप’ पण ते प्रारब्धानुरूप घडत असते. वस्तुतः हृदयामध्ये श्रीहरीचे सत्स्वरूप चिंतन करणे हेच सर्व तपांमध्ये श्रे÷ तप होय. जो स्वधर्माने वागत असून हरीला अंतःकरणात विसरत नाही, जो अहोरात्र मनामध्ये आत्मस्वरूपनिश्चयाचीच विवंचना करीत असतो. लोभी ज्याप्रमाणे नेहमी द्रव्याचेच चिंतन करतो किंवा तरुण स्त्री ज्याप्रमाणे तरुणाचेच चिंतन करते, त्याप्रमाणे ज्याचे ‘मन’ सदासर्वदा आत्मस्वरूपाचाच विचार करीत राहते त्यालाच ‘तपोनि÷’ म्हणतात. हे तप सर्व तपांमध्ये श्रे÷ होय. ब्राह्मणस्वभावातील ह्या श्रे÷ गुणालाच ‘उज्ज्वल तप’ असे म्हणतात. आता शौचाचा म्हणजे पवित्रतेचा विचार ऐक. त्यामध्ये दोन प्रकार आहेत ते म्हणजे अंतःकरणामध्ये ज्ञानाचा निश्चय आणि बाहेर वेदोक्त आचार. शरीरावर बाह्य मळ असतात, त्यांचे क्षालन वेदविधानाप्रमाणे मृत्तिका व जल इत्यादिकांनी करावे आणि आत्मज्ञाननि÷sने अंतःकरणांतील मल धुऊन काढावेत. उद्धवा ! ह्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मलपणा मिळवणे हेच शौचाचे मुख्य लक्षण होय. आता संतोषाचेही संपूर्ण लक्षण सांगतो. पुत्र जन्मास आला असता आनंद वाटतो व तो गेला की लगेच दुःख होते, द्रव्य मिळाले म्हणजे हर्ष होतो आणि ते गेले की तत्काळ दुःख होते. पण ज्या सुखाची प्राप्ती होताच कोटी दुःखें निखालस मावळून जातात, त्याचंच नाव खरे व शाश्वत सुख होय. ह्याशिवाय इतर जी बडबड ती व्यर्थ होय. माझ्या भक्तीने अंतःकरणात जे स्वाभाविक सुख प्राप्त होते, ते संपत्ती किंवा विपत्ती आली तरी सर्वत्र समभाव झाल्याने संतोषच उत्पन्न करते. ह्या शब्दांमध्ये कोठे पाठभेद आढळतो. मोठमोठे विद्वान् लोक संतोषाऐवजी ‘तितिक्षा’ म्हणतात. त्याचाही अर्थ ऐक. त्यातील रहस्य हे की, थंडी व उन्ह, मृदु व कठीण ह्यांपैकी काहीही येऊन अंगावर कोसळले तरी त्याचे मन डळमळत नाही. ह्याचे कारण ह्या द्वंद्वांमध्ये त्याची मद्भावना असते. संतोष किंवा तितिक्षा ह्याचे निरूपण मी तुला सांगितले.
क्रमशः