साहित्यासह शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱया ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाने एक चिंतनशील, बहुआयामी व समाजभान असलेला लेखक महाराष्ट्राने गमावला आहे. मागच्या साडेचार ते पाच दशकांच्या डॉ. कोत्तापल्ले यांच्या कारकिर्दीचा धांडोळा घेतला, तर त्यांनी या क्षेत्रात किती मूलभूत स्वरुपाचे काम केले, याची प्रचीती येते. मराठीचे अध्यापक-कुलगरू, साहित्यिक-समीक्षक, साहित्य परिषदेसह वेगवेगळय़ा साहित्यविषयक संस्था वा समित्यांचे सदस्य-पदाधिकारी तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे त्यांच्या कारकिर्दीचे प्रमुख चार टप्पे करता येतील. मराठवाडा विद्यापीठातून बीए आणि एमए प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱया कोत्तापल्ले यांचा अध्यापक ते कुलगुरू हा प्रवास विलक्षणच म्हणायला हवा. प्रारंभी बीड येथील महाविद्यालयात 1971 ते 1977 या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत राहिलेल्या डॉ. कोत्तापल्ले यांनी 1996 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिव्याख्याता व प्रपाठक या पदावर, तर 1996 ते 2005 पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून बजावलेली सेवा त्यांच्यातील विद्यार्थीप्रिय, चिकित्सक व समाजशील शिक्षकाचेच दर्शन घडविते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची कारकीर्द तर अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरावी. संवाद, हा त्यांच्या प्राध्यापकीय सेवेचा विशेष म्हणता येईल. त्यांच्यातील शिक्षक हा सदैव संवादी राहिला. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या समजून घेणे त्यांना शक्य झाले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, यावर त्यांचा कटाक्ष असे. ‘कमवा व शिका’सारखी योजना अधिक प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लावण्याचे त्यांचे कार्य अजोडच. ‘कॉपीमुक्ती’साठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र व यातून घडलेला स्वयंस्फूर्त बदल, हे सारे क्रांतिकारकच होय. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक मुले लिहिती करण्याचे, विद्यापीठ व मराठी विभागास अधिकाधिक समाजाभिमुख करण्याचे श्रेयही त्यांना द्यावे लागेल. साहित्यिक म्हणूनही त्यांनी कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, समीक्षा, अनुवाद, संपादन अशा वेगवेगळय़ा वाङ्मय प्रकारात मुक्तपणे मुशाफिरी केली. मार्क्सवादाचा प्रभाव असलेल्या डॉ. कोत्तापल्ले यांनी आपल्या लेखनातून प्रामुख्याने ग्रामीण, निमशहरी भागातील अभावग्रस्त व वंचितांची वेदना मांडली. सामाजिक बांधिलकी हाच त्यांच्या लेखनाचा गाभा असल्याने ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्यांच्या लेखनात सखोल चिंतन, वैचारिक डूब असे. त्यांची समीक्षाही अशीच परखड व वास्तवदर्शी. साहित्यिक परिचित असो वा अपरिचित. नवोदित असो वा ज्येष्ठ. त्यांच्या समीक्षेला याचे वावडे नव्हते. एखादे पुस्तक मनात उतरले, की त्यावर त्यांची लेखणी चाले. त्यांच्या समीक्षेच्या आड त्यांचे कुलगुरूपद वा संमेलनाध्यक्षपदही आले नाही, हे त्यांचे वेगळेपण होय. मुळात कुणाला खूष करण्यासाठी त्यांनी परीक्षण केले नाही. प्रामाणिक व कठोर चिकित्सा हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्टय़ होते. साहित्य संस्था व विविध समित्यांची जबाबदारीही त्यांनी चोखपणे पार पडली. मराठवाडा साहित्य परिषदेत अगदी क्लार्कपासून काम सुरू करीत या संस्थेच्या जडणघडणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, भाषा सल्लागार समिती असो वा अन्य संस्था व समित्या असोत. प्रत्येक संस्थेवर त्यांनी कार्यकर्ता म्हणून उमटविलेला ठसा अमीटच म्हणायला हवा. चिपळूण येथे 11 ते 13 जानेवारी 2013 या कालावधीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मांडलेली भूमिका ही दिशादर्शक ठरावी. समाजाला आकार देण्यासाठी वैचारिक लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, एकोणिसाव्या शतकातील वैचारिक लेखनाची सघन परंपरा स्वातंत्र्यानंतर उरली नाही. असे का व्हावे, याचे महाराष्ट्राने चिंतन करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केली होती. वैचारिक साहित्याचा वाढता दुष्काळ पाहता यावर सातत्याने ऊहापोह व्हायला हवा. डॉ. कोत्तापल्ले यांचे मूळ घराणे तेलगू असले, तरी संपूर्ण आयुष्य ते मराठी म्हणूनच जगले. ‘मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे,’ ही त्यांची भूमिका केवळ मराठीवरच्या प्रेमातून नव्हे तर सखोल अभ्यासातून आलेली होती. डॉ. कोत्तापल्ले हे कमालीचे परखड व स्पष्टवक्ते होते. साहित्य संमेलनात धार्मिक प्रतीके असता कामा नयेत. साहित्य संमेलन वा साहित्य महामंडळासारख्या संस्थांनी सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवायला हवा. विविध समाजघटकांसह वेगवेगळय़ा विचारप्रवाहातील मंडळींशी वा संस्थांशी संवाद वाढवायला हवा, असे खडे बोलही डॉ. कोत्तापल्ले यांनी संमेलनाच्या मंचावरून सुनावले होते. संमेलनाध्यक्षांचे भाषण बऱयाचदा त्यातील क्लिष्ट व रुक्षपणामुळे झाकोळले जाते. परंतु, डॉ. कोत्तापल्ले यांनी सर्वांना उमजेल अशा भाषेत संवाद साधल्याने ते उल्लेखनीय ठरले. त्या अर्थी अलीकडच्या काही वर्षांतील हे उत्कृष्ट भाषण ठरावे. खऱया साहित्याविषयी त्यांनी मांडलेली मतेही मौलिक होत. प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारे साहित्य हे अधिक लक्षणीय असते. ते व्यवस्थेशी झोंबी घेणारे, वास्तवाचे झडझडून भान देणारे, जागे करणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाचे लावणी करणारे असते, असे डॉ. कोत्तापल्ले म्हणतात. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्य हे साहित्यातच नव्हे, तर देशाच्या संस्कृतीतही भर घालते, हा त्यांचा विचार आजच्या काळात अधिक समजून घ्यायची गरज आहे.
Previous Articleजी-20 अध्यक्षपद मिळणे अभिमानास्पद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.