गुरुवारीही काम होते बंद : शेतकरी आंदोलनाच्या तयारीत : मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असताना मंगळवार दि. 26 रोजी पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱयांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे पोलीसबळाचा वापर करत शेतकऱयांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन शेतकऱयांनी आंदोलन सुरू ठेवले. बुधवारी दुपारनंतर रस्त्याचे काम बंद करण्यात आले. गुरुवारीही काम बंद असल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाची स्थगिती असताना पुन्हा मच्छे गावाकडून हा रस्ता करण्यास सुरुवात करण्यात आली. हा एकप्रकारे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे शेतकऱयांचे वकील ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी काही अधिकाऱयांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. आता न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी शेतकऱयांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे.
न्यायालयातून तुम्ही परवानगी घ्या, आम्ही त्याला सहकार्य करू. मात्र न्यायालयात खटला असताना अशाप्रकारे दडपशाही करत तुम्ही आमची जमीन घेत असाल तर आम्ही कदापिही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे. बुधवारी कंत्राटदाराने या परिसरातील सर्व साहित्य हलविले आहे. त्यामुळे हे काम बंद करण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकवेळी मच्छे येथून रस्ताकामाला सुरुवात होत आहे. येथील शेतकरी अनगोळकर यांच्या उसाचे वारंवार नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना फटका बसला आहे.
मागीलवेळीही त्यांच्या उभ्या ऊस पिकातून रस्ता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आताही ऊसपीक जोमात असताना शेतकऱयाचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या बेळगाव येथील आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुनावणीचे काम झाले नाही. असे असताना रस्त्याचे काम सुरू केले आहे. उच्च न्यायालयातही एक खटला प्रलंबित आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी आपले म्हणणेदेखील मांडले नाही. असे असताना पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही बाब न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचा आरोप करत शेतकऱयांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी अवमान याचिका दाखल केली आहे.
लवकरच तोडगा काढू : बसवराज बोम्माई
हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकऱयांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली. यावेळी रस्त्यासंदर्भात मला काही कल्पना नाही. याबाबत लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांना दिले आहे.
यावेळी पोलिसांकडून आमच्यावर दडपशाही केली जात आहे, अशी तक्रार शेतकऱयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर त्यांना सूचना करतो, असे बोम्माई यांनी सांगितले.