जिह्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक सहभागी; मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी
सरकारने जाचक अटी लावून रेशनवरील धान्य सोडण्यासाठी सुरु केलेली सक्ती थांबवावी, दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, कामगार, शेतकर्यांचे रेशन चालू ठेवा, रेशनचा अधिकार कायम करावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा (माकप)तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिह्याच्या कानाकोपर्यातून आंदोलन सहभागी झाले होते. या ठिकाणी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दसरा चौक येथून दुपारी 1 वाजण्याच्य सुमारास कॉ. चंद्रकांत यादव व प्राचार्य कॉ. ए. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याबरोबरच ‘मी रेशनवरील धान्याचा अधिकार सोडणार नाही’ असे आंदोलकांनी भरलेले फॉर्मही प्रशासनाला सादर करण्यात आले.
यावेळी प्राचार्य ए. बी. पाटील, कॉ. चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या रेशनविरोधी धोरणावर सडकून टिका केली. रेशनसंदर्भातील विविध मागण्या सरकारने मान्य न केल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
निवेदनातील मागण्या अशा, दोन चाकी वाहन, तीन चाकी वाहन आहे म्हणून रेशन बंद करु नये, पात्र रेशनधारकांना रेशन मिळालेच पाहीजे, 2013 नंतरच्या सर्व रेशनकार्डधारकांना बारा अंकी नंबर आणि धान्य मिळेल याची व्यवस्था करा, धान्य आणि इतर खाद्यपदार्थांवरील जी.एस.टी. रद्द करावा, दसरा दिवाळीसाठी साखर, रवा, डाळ आदींचा पुरवठा करावा, शासन योजनेतून घरकुल किंवा पंतप्रधान आवासच्या विविध योजनांमधून स्लॅबचे घर बांधले असल्यास त्यांना रेशन योजनेतून वगळू नये, जिह्यातील अन्न सुरक्षा योजनेचा इष्टांक वाढवावा, दोन लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील लोकांना रेशनचा लाभ द्यावा,
आंदोलनात कॉ. शिवाजी मगदूम, अमोल नाईक, मुमताज हैदर, चंद्रकला मगदूम, विकास पाटील, विवेकानंद गोडसे, आबासो चौगुले, राजेश वरक, सदा मलाबादे, संदेश जाधव, नारायण गायकवाड, आनंदराव चव्हाण, शिवगोंडा खोत, दत्ता माने, अनिता वड्ड, आप्पा परिट, वत्सला भोसले, दिनकर आदमापुरे आदी सहभागी झाले होते.