ग्लोबल पाटीदार बिझनेस समिटमध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन : 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान कार्यक्रम
नवी दिल्ली, सुरत / वृत्तसंस्था
भारताच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण असून विविध क्षेत्रे आणि व्यवसायांमधील प्रगतीमुळे देशविकास होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. आज भारताकडे खूप काही आहे. आपल्याला फक्त आपला आत्मविश्वास, स्वावलंबनाची भावना मजबूत करायची आहे. विकासात सर्वांचा सहभाग असेल, सर्वांनी मेहनत घेतली तरच हा आत्मविश्वास वाढत जाईल, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल पाटीदार बिझनेस समिटमध्ये केला.
गुजरातमधील सुरत येथे आयोजित ग्लोबल पाटीदार बिझनेस समिटचे (जीपीबीएस) व्हर्च्युअल उद्घाटन पंतप्रधानांनी शुक्रवारी केले. सरदारधाम येथे 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी विविध कंपन्यांच्या प्रगतीचे कौतुक केले. आज मुद्रा योजना देशातील व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. स्टार्ट-अप इंडियामुळे टॅलेंटला वाव मिळत असून आज युनिकॉर्नची स्वप्ने पूर्ण होताना दिसत आहेत. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच पीएलआय योजनेने जुन्या क्षेत्रांमध्ये मेक इन इंडियाचा उत्साह तर भरला आहेच, पण सेमीकंडक्टरसारख्या नवीन क्षेत्रांच्या विकासाच्या शक्मयताही निर्माण केल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरदार साहेबांनी भारतात संपत्तीची कमतरता नाही असे सांगितले होते. आपण फक्त आपले मन आणि संसाधने त्यांच्या सर्वोत्तम वापरासाठी लावली पाहिजेत. प्रगतीच्या वाटचालीत गती साधण्यासाठी सरदार साहेबांचे हे शब्द आपण कधीही विसरता कामा नये, याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली.
नव्या धोरणांद्वारे आणि कृतींद्वारे देशात विकासात्मक वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा सतत प्रयत्न आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनाही उद्योजक करण्यासाठी सरकार हातभार लावत आहे. आधुनिक कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांचा विकास, नवीन शहरांची उभारणी, जुन्या शहरांमध्ये स्मार्ट सुविधांचा विकास, देशाला जुन्या नियम-कायद्यांपासून मुक्त करणे आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार तत्पर असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
एमएसएमई क्षेत्राचा वेगाने विकास
कोरोना संसर्गाच्या काळात प्रचंड आव्हानांवर मात करत देशातील एमएसएमई क्षेत्र आज वेगाने विकसित होत आहे. लाखो कोटी रुपयांची मदत देऊन एमएसएमईशी संबंधित कोटय़वधी नोकऱया वाचल्या आणि आज हे क्षेत्र वेगाने नवीन रोजगार निर्माण करत आहे. देशाच्या जडणघडणीत लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येक व्यवसायाचे महत्त्वाचे योगदान आहे. रस्त्यावर छोटासा व्यवसाय करणारा देशवासीय आज भारताच्या विकासाशी जोडलेला वाटतो. प्रथमच, रस्त्यावरील विपेत्यांनाही पीएम स्वानिधी योजनेतून औपचारिक बँकिंग प्रणालीमध्ये सहभाग मिळाला आहे. अलीकडेच आमच्या सरकारने ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
तीन दिवस चालणार परिषद
29 एप्रिल ते 1 मे दरम्यान पाटीदार समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरदारधाम ‘मिशन 2026’ अंतर्गत ‘जीपीबीएस’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘आत्मनिर्भर समुदाय ते आत्मनिर्भर गुजरात आणि भारत’ या थीमअंतर्गत समुदायातील लहान, मध्यम आणि मोठय़ा उद्योगांना एकत्र आणणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. तसेच नवउद्योजकांचे पालनपोषण आणि समर्थन करणे आणि शिक्षित तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगारासाठी मदत करणे ही उद्दिष्टेही साध्य केली जाणार आहेत. तीन दिवस चालणाऱया या समिटमध्ये सरकारी औद्योगिक धोरण, एमएसएमई, स्टार्टअप्स, इनोव्हेशन इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे.