पुणे / प्रतिनिधी :
राज्यपालांना त्यांच्या राज्यात परत जायचे आहे, असे ते खासगीत सांगत असतात. म्हणूनच आपल्या राज्यात परत जाण्यासाठीच राज्यपालांकडून अशी विधाने केली जात आहेत का? ते मुद्दाम असे बोलत आहेत का, असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर सोमवारी निशाणा साधला. शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्ये महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज ठाकरे यांचे विचार त्यांच्याबरोबर, माझे विचार माझ्याबरोबर आहेत. आम्ही स्पष्टपणे बोलतो. ‘ओठात एक आणि पोटात एक’ अशी आपली भावना कधीच नसते, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणून मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी आम्ही जे बोलतो, ती आमची वैयक्तिक भूमिका असते, ती पक्षाची भूमिका नसते. सहसा पक्षाची भूमिका प्रवक्ते, पक्षाचे प्रांताध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करतात. परंतु, विरोधी पक्षनेता म्हणून समाजात वावरताना मला जे वाटते, ते मी माध्यमांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कोणीतरी काहीतरी बोलते आणि बेरोजगारीसह शेतकऱ्यांचे वगैरे मुद्दे मागे पडतात आणि इतर विषयांवर चर्चा सुरू होते.
अधिक वाचा : अखेर बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…
आपले राज्यपालदेखील खासगीत सांगतात, की त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचे आहे. मग या साऱ्यामागे हेही कारण आहे की काय, हे कळायला मार्ग नाही. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे लंगडे समर्थन करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारे वक्तव्य करण्याचे काहीच कारण नाही. महाराष्ट्र ते खपवूनही घेणार नाही, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.