पंतप्रधान मोदींना संबोधिले ‘रावण’ ः भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची मंगळवारी सांगता झाली आहे. परंतु यापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. गुजरातमधील एका सभेला संबोधित करताना खर्गे याहंनी पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे करत मते मागण्याबद्दल भाजपला लक्ष्य केले. मोदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतात, मोदींना रावणाप्रमाणे 100 डोकी आहेत का असे प्रश्नार्थक विधान खर्गे यांनी केले आहे. खर्गे यांच्या या विधानावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील मोदींना मतदान करा असे सांगत आहे, स्थानिक स्तरावर मोदी कामे करण्यासाठी येणार आहेत का? पंतप्रधान सदैव स्वतःबद्दलच बोलत असतात. तुम्ही अन्य कुणाकडे पाहू नका, मोदींकडे पाहून मतदान करा असे भाजप नेते म्हणत आहेत. परंतु मोदींचा चेहरा कितीवेळा पहायचा. पालिकेत मोदींचा चेहरा, आमदाराच्या निवडणुकीत मोदींचा चेहरा, खासदारांच्या निवडणुकीतही मोदींचा चेहरा लोकांनी पहायचा. मोदींचे रावणासारखे 100 शीर आहेत का अशी प्रश्नार्थक टिप्पणी खर्गे यांनी केली आहे.
भाजप संतप्त
खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींना रावण संबोधिणे घोर अपमान आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पूर्ण गुजरातचा अपमान केला आहे. हे वक्तव्य केवळ खर्गे नव्हे तर सोनिया गांधी अन् राहुल गांधींचे आहे. सोनियांच्या सुचनेनुसारच खर्गे यांनी पंतप्रधानांचा अपमान केला आहे. सोनिया गांधी यांनी मोदींना मृत्यूचा सौदागर ठरविले होते. तर मधुसूदन मिस्त्राr यांनी मोदींना औकात दाखवून देणार असल्याचे विधान केले होते. परंतु पंतप्रधानांनी दहशतवादाला औकात दाखवून दिली असल्याचे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
गुजरातच्या पुत्राचा अपमान
गांधी कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल द्वेष वाटतो. पंतप्रधान मोदींना क्रूर, माकड अन् राक्षसही म्हटले गेले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी मोदींना उद्देशून ‘नालायक’ संबोधिले होते. तुकडे-तुकडे गँस शिव्या वाहते, तेव्हा देश एकत्रित असल्याचे स्पष्ट हेते. या शिव्यांचा सूड मतदानातून घ्यायचा आहे. गुजरातची जनता स्वतःच्या मतदानाने या अपमानाचा सूड उगविणार असल्याचे पात्रा म्हणाले. काँग्रेसकडून गुजरातच्या पुत्राचा अपमान केला जातोय असा दावा भाजपचे नेते अमित मालवीय यांनी केला आहे.