अमित शाह यांच्या हस्तक्षेपानंतर बौद्ध भिक्षूने रोखली यात्रा
वृत्तसंस्था/ लेह
लडाखमध्ये 60 वर्षे जुन्या वादाप्रकरणी पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मुस्लीमबहुल कारगिलमध्ये बौद्ध मठाच्या निर्मितीवरून लेह आणि कारगिलचे लोक आमने-सामने आले आहेत. लेहचे बौद्ध भिक्षू रिनपोछे यांनी चालू महिन्याच्या प्रारंभी सुमारे 1 हजार अनुयायांसोबत कारगिलच्या पदयात्रेस सुरवात केली. गृहमंत्री अमित शाह यांच्या आवाहनानंतर रिनपोछे यांनी ही यात्रा रोखली आहे. 1961 मध्ये जम्मू-काश्मीर सरकारने कारगिलमध्ये बौद्धांना भूखंड प्रदान केला होता. लेहमधील बौद्ध लोकसंख्येतील एक वर्ग तेथे मठ निर्माण करू पाहत आहे.
दुसरीकडे कारगिलमधील धार्मिक, सामाजिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी याच्या विरोधात आवाज उठविला आहे. संघर्षाच्या भीतीमुळे प्रशासनाने रिनपोछे यांना कारगिलपासून 35 किलोमीटर अंतरापूर्वीच रोखले आहे. या वादाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मिळाल्यावर त्यांनी रिनपोछे यांना शांतता आणि सौहार्दाने तोडगा काढण्याचा संदेश दिला असल्याची माहिती लेहमधील भाजप नेत्याने दिली ओ.
शाह यांच्या आवाहनानंतर रिनपोछे यांनी यात्रा रोखली असली तरीही परतण्यापूर्वी मुलबेकमध्ये धार्मिक विधी केले आहेत. बौद्धबहुल लेहमधील सर्व पक्ष या पदयात्रेच्या बाजूने नव्हते. लेह बौद्ध संघानुसार काही नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता.
आंदोलन सुरूच ठेवणार
दोन्ही बाजू याप्रकरणी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर सहमत होत्या. शहरात मैदानी भूमीची कमतरता आहे. शाळा आणि रुग्णालयांचा आकार कमी करावा लागला आहे किंवा त्यांना शहराबाहेर हलवावे लागले असल्याचा दावा कारगिलच्या लोकांचा आहे. तर दुसरीकडे लेह बौद्ध संघ कारगिलचे अध्यक्ष स्कार्मा दादुल यांनी आम्ही मठ निर्मितीचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
अन्य पर्यायावर विचार सुरू
बौद्धबहुल असूनही लेहमध्ये मशीद आहे, परंतु कारगिलमध्ये बौद्ध मठाला जागा नाही. अतिथीगृहाच्या दुरुस्तीचीही अनुमती दिली जात नसल्याचे लेहच्या एका व्यापाऱयाचे म्हणणे आहे. लेहमध्ये मोठय़ा संख्येत मुस्लीम असल्याने तेथे मशीद असल्याचे कारगिलमधील एका नेत्याचे सांगण आहे. परंतु दोन्ही बाजूंदरम्यान चर्चा सुरू आहे. बौद्धांना पर्यायी जमीन देण्याचा प्रस्ताव आहे.
1691 मध्ये भूखंड वाटप
जम्मू-काश्मीर सरकारने 1961 मध्ये बौद्ध मठासाठी कारगिलमध्ये भूखंड दिला होता. परंतु 1969 मध्ये भूखंडाचा वापर वाणिज्यिक किंवा नागरी उद्देशापुरती मर्यादित करण्यात आला होता. आता त्या भूखंडावर बौद्ध अतिथीगृह आहे. कारगिलमध्ये बौद्धांचे वास्तव्य नसल्याने मठाचा हट्ट का अशी विचारणा तेथील संघटनांकडून केली जात आहे.