वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भारताचे कायदेशीर नागरीक आहेत की नाही, यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. सुब्रम्हणियम स्वामी यांनी या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. गांधी यांच्याकडे ब्रिटनचेही नागरीकत्व आहे, असा त्यांचा आरोप आहे. अशा प्रकारे दोन देशांचे नागरीकत्व एका व्यक्तीकडे असू शकत नाही. त्यामुळे त्यांचे भारतीय नागरीकत्व काढून घेण्याचा आदेश केंद्रीय गृहविभागाला देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत आहे.
राहुल गांधी हे ब्रिटनमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या बॅकोप्स कंपनीचे 2003 मध्ये संचालक आणि सचिव होते. या कंपनीचे संचालकत्व मिळविण्यासाठी गांधी यांनी आपण ब्रिटनचे नागरीक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. 2005 आणि 2006 या वर्षांमध्ये या कंपनीने जी करविवरणपत्रे सादर केली, त्यांच्यात राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरीक असल्याचा उल्लेख आहे. या कंपनीने 2009 मध्ये सादर पेलेल्या दिवाळखोरी अर्जातही राहुल गांधी ब्रिटनचे नागरीक असल्याचा उल्लेख आहे, असे प्रतिपाद स्वामी यांनी आपल्या याचिकेत केले आहे.
2019 मध्ये विचारणा
नागरीकत्वासंबंधी नेमकी काय परिस्थिती आहे, हे 15 दिवसांमध्ये स्पष्ट करावे, अशी विचारणा केंद्रीय गृहविभागाने 2019 मध्ये राहुल गांधी यांच्याकडे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या संबंधातील याचिका फेटाळली होती. गांधी यांचे राष्ट्रीयत्व कंपनी ठरवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.