प्रतिनिधी / बेळगाव
फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था-पुणे, बेळगाव शाखेच्यावतीने दुसरे ज्योतिष अधिवेशन बेळगावात आयोजित करण्यात आले होते. पं. विजय जकातदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. सरस्वती पूजन करून अधिवेशनास प्रारंभ करण्यात आला.
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास कोणत्या निकषावर केला जातो, ज्योतिषाची कर्तव्ये कोणती याबाबत चर्चा करण्यासाठी ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. याप्रसंगी गणेश शास्त्राr शुक्ल, प्रा. पं. तेजराज किंकर, वेदमूर्ती वासुदेव छत्रे, दिलीप सोहनी, मय्याप्पा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन झाले.
याप्रसंगी हिंडलगा ग्रा. पं. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, ग्रा. पं. सदस्य रविकुमार कोकितकर आदी उपस्थित होते. ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्याची संधी फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेच्यावतीने उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी दत्तात्रय फडके यांनी दिली.
ज्योतिष शास्त्राचा जन्म कसा झाला? तसेच आजच्या युगात ज्योतिष शास्त्राचा उपयोग कसा केला जातो? याची माहिती देण्यात आली. ज्योतिष शास्त्राकडे व्यवसाय म्हणून न पाहता धर्म म्हणून पाहावे यासाठी आपली भूमिका महत्त्वाची असून याची जाण ठेवून जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी, असे मत वेदमूर्ती वासुदेव छत्रे यांनी व्यक्त केले. ज्योतिष शास्त्राचा उपयोग वर्षानुवर्षे केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही राज्याभिषेकावेळी आणि किल्ल्यांच्या बांधणीवेळी ज्योतिष पंडितांची मदत घेतली होती. केवळ ज्योतिष म्हणून याकडे न पाहता, याला वैज्ञानिक कारणेही असल्याचे नागेश मन्नोळकर यांनी सांगितले.
शहरात शेकडो ज्योतिष पंडित असून अभ्यास मंडळाच्या अधिवेशनाला त्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. त्यामुळे बेळगावातील ज्योतिष कोणत्या अभ्यासानुसार नागरिकांना ज्योतिष सांगतात? असा मुद्दा गणेश शास्त्री शुक्ल यांनी उपस्थित करून खंत व्यक्त केली.
याप्रसंगी विजय जकातदार, मण्णूर ज्योतिर्लिंग मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन दिलीप सोहनी, पं. तेजराज किंकर, मय्याप्पा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ झाला. नितीन तेंडोलकर यांनी घटस्फोट का होतात याबाबत सविस्तर माहिती दिली. इकिगाई व ग्रहांचे कनेक्शन या विषयावर प्रा. पं. तेजराज किंकर यांनी माहिती दिली. ‘कोरोना’ या जागतिक संकटावर आधारित आरती घाटपांडे यांनी सविस्तर चर्चा केली. मयुरेश रिसबूड यांनी ‘पुनर्फू योगाचे फल कारकत्व’ या विषयावर ज्योतिष शास्त्राबाबतचा अनुभव सांगितला. दुसऱया सत्रात पल्लवी जकातदार-चव्हाण, दत्तात्रय फडके, सुरेश बसर्गेकर, हेमलता साळोखे, भुजंग मयेकर यांनी विविध विषयांवर माहिती दिली.