धान्य वितरणासाठी रेशन धान्य दुकानदारांसह प्रशासनाची तारांबळ
प्रतिनिधी/रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य सरकारने घोषणा केलेला ‘आनंद शिधा’ रेशनधान्य दुकानावर पोहोचला नव्हता. दिवाळीचं धान्य पोहोचणार कधी आणि त्यापासून पदार्थ बनणार कधी, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात असताना राज्य शासनाचे जिल्ह्यात शुकवारी शिधापत्रिकाधारकांसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ दाखल झाला आणि धनत्रयोदशीच्या दिवशी रेशनधान्य दुकानांवर वाटप करण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या शिधा वाटपामुळे तो वितरणास रेशन धान्य दुकानदारांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
दिवाळीनिमित्त राज्य शासनाने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ‘आनंदाच शिधा’ या दिवाळी पॅकेटची घोषणा केली होती. यामध्ये शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात साखर, तेल, चणाडाळ, रवा हे जिन्नस मिळणार होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या फोटोसह सज्ज अशा दिवाळी पॅकेटने सामान्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार होती. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेत समाधान व्यक्त केले जात होते. हे दिवाळी पॅकेट दिवाळीच्या किमान 8 दिवस आधी पोहोचणे गरजेचे होते. जेणेकरुन या जिन्नसापासून दिवाळीसाठी फराळ करणे शक्य झाले असते. मात्र दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील रेशनधान्य दुकानांवर हा ‘आनंद शिधा’ पोहोचल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.
हे ही वाचा : मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर पुन्हा गोत्यात?
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 943 धान्य दुकान आहेत आणि या धान्य दुकानांवर 2 लाख 76 हजार 868 शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी 37 हजार 770 शिधापत्रिकाधारक हे अंत्योदय योजनेतील आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडे या बाबत चौकशी केली असता महाराष्ट्र राज्य अन्न पुरवठा विभागाकडून संबंधित धान्य येण्यास उशिर झाल्याचे समजले.