आरोग्य संचालक गीता काकोडकर यांचे आवाहन : प्रत्येकासाठी लसीकरण, स्वसंरक्षण आवश्यक
प्रतिनिधी /पणजी
राज्यात वाढणाऱया कोरोना बाधितांच्या संख्येचा अंदाज घेता लसीकरण सर्वात महत्वाचे असून प्रत्येकाने स्वसंरक्षणासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी केले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गत काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे राज्य कोरोनामुक्त झाले असल्याचा समज करून घेत लोकांनी मास्क वापरणे सोडून दिले होते. परंतु विद्यमान स्थितीत राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी 47 रुग्ण सापडले होते. त्यात शुक्रवारी नव्याने 50 रुग्णांची भर पडली आहे. ही वाढ सध्या अल्प वाटत असली तरीही प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाल्या.
कोरोनाचा नवा संसर्ग नाही
त्यातल्या त्यात आणखी एक समाधानाची बाब म्हणजे हा कोरोनाचा नवा संसर्ग वगैरे नाही. शुक्रवारी 68 सँपल्स तपासण्यात आले होते. त्यांची आझिलोतील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता ते सर्व विद्यमान बीए2 (ओमिक्रॉन) व्हेरिएंटस्च असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे काकोडकर यांनी सांगितले.
लसीकरण, स्वसंरक्षण महत्वाचे
कोरोनावर सध्यातरी लसीकरण हाच एकमेव सुरक्षा उपाय आहे. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मास्कचा वापर जरूर करावा, तशी वेळ आलेली आहे. त्यासाठी कोणत्याही नियम वा कायद्याची सक्ती करण्याची गरज नाही. स्वसंरक्षणासाठी मास्क वापरणे हिताचे, असे त्या म्हणाल्या.
रविवारी राज्यात पुन्हा ‘टीका उत्सव’
राज्य सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे सध्याच्या कथित तिसऱया लाटेत तरी आजपर्यंत गंभीर असे रुग्ण सापडलेले नाही. त्यामुळे कोणत्याही बळीचीही नोंद झालेली नाही. राज्यात आजही लसीकरण मोहीम चालू आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. सर्व आरोग्य केंद्रांवर रात्री 8 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय ’हर घर दस्तक’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच उद्या रविवार दि. 5 रोजी राज्यात टीका उत्सव आयोजित करण्यात आहे, त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. त्याशिवाय बुस्टर डोस घेण्यास पात्र असलेल्यांनी तोही डोस घ्यावा, असे आवाहन डॉ. काकोडकर यांनी केले.
54 हजार लोकांनी घेतला बुस्टर डोस
राज्यात बुस्टर डोसला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी असून अद्याप सुमारे 1.80 लाख लाभार्थी त्यांचे बुस्टर डोस घेणे बाकी आहेत. आतापर्यंत 54 हजार लोकांनी हा डोस घेतला आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर मुलांसाठी लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होईल. आजपर्यंत 15 ते 17 वर्षे वयोगटातील 93 टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे. दुसऱया डोसचे प्रमाण 80 टक्के आहे, असे बोरकर यांनी पुढे सांगितले.
शुक्रवारी कोरोनाचे अर्धशतक
गत तीन महिन्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ ठरत शुक्रवारी तब्बल 50 कोरोनाबाधितांची नोंद झाली अ्नाहे. गुरुवारी 47 बाधित सापडले होते. सुदैवाने यातील कोणताही बाधित गंभीर नसल्यामुळे सर्वांना गृहविलगीकरण देण्यात आले आहे.
या वाढीमुळे पुन्हा एकदा जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सरकारच्या चिंतेतही भर पडली आहे.
शुक्रवारी 24 तासात 782 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 50 बाधित सापडले तर 18 रुग्ण बरे झाले आहेत. त्याद्वारे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 245946 वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 241897 वर पोहोचली आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येने 200 चा आकडा पार केला असून शुक्रवारी 217 सक्रीय रुग्ण नोंद झाले आहेत. संसर्गाचे प्रमाण 98.35 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोना वाढीचे प्रमाण 6.39 टक्के नोंद झाले आहे.