मास्कचा वापर सुरू करा : मुख्यमंत्री : बुधवारी 14 नवे बाधित, बळी नाही
प्रतिनिधी /पणजी
राज्यात बुधवारी 14 कोरोनाबाधित सापडले असून मंगळवारी सापडलेल्या 7 बाधितांच्या संख्येत 24 तासातच दुप्पट वाढ दिसून आली आहे. त्यावरून कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
या पार्श्वभूमिवर आता लोकांनी मास्कचा वापर सुरू करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. गत 24 तासात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बुधवारी सापडलेल्या सर्व बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यातील एकूण सक्रिय रूग्णसंख्या 39 वर पोहोचली आहे.
राज्यात आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 245409 एवढी झाली असून त्यातील 241538 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3832 जणांचे बळी गेले आहेत.