कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक : जनजागृतीची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना पुन्हा हळूहळू शिरकाव करू लागला आहे. काही राज्यांमध्ये आणि कर्नाटकातील शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून त्यांची संख्याही वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाल्याचे वृत्त आहे. अशावेळी पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक ठरणार आहे. आता इतर कोणी म्हणजेच प्रशासन, महानगरपालिका किंवा सामाजिक संघटना यांनी जनजागृती करावी, मास्क द्यावेत, अशी अपेक्षा न करता प्रत्येक नागरिकाने सुज्ञपणे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.
कोरोना हळूहळू पसरत असला तरी ही चौथी लाट नव्हे असे तज्ञ आणि राजकीय नेते सांगत आहेत. तथापि, काळजी घेणे हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी बेळगावकर निर्धास्तपणे फिरत आहेत. मात्र एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या वाढण्यापूर्वीच प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास कोरोनाची किंवा चौथ्या लाटेची भीती बाळगण्याचे कारण नाही.
सरकारने मास्कची सक्ती केली असली तरी शहरात त्याचे गांभीर्य अद्याप दिसून येत नाही. सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. वटपौर्णिमेनिमित्त तर वडाला धागा गुंडाळण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली. वडाच्या झाडामधून भरपूर प्राणवायू मिळतो हे जरी खरे असले तरी सामाजिक अंतराचा नियम धाब्यावर बसविल्यास कोरोना कधी शिरकाव करेल, हे सांगता येत नाही.
कोरोना नियमावली धाब्यावर
कोरोना आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता आता प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि हात सॅनिटाईज करणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. सध्यातरी तीनही नियम धाब्यावर बसविल्याचे दिसते. बाहेर जाणाऱया नोकरदारांमुळे घरामधील लहान मुलांना कोरोना होऊ शकतो. पुन्हा शाळा, अभ्यास यावर त्याचा विपरित परिणाम होण्यापूर्वीच कोरोना नियमांचे पालन करणे हे शहाणपणाचे ठरणार आहे. ही बाब बेळगावकर गांभीर्याने घेतील का? हा प्रश्न आहे.