गटारी, रस्त्यांअभावी जनता मेटाकुटीला
प्रतिनिधी /बेळगाव
यरमाळ रोडवरील वड्डर छावणी येथील पहिल्या क्रॉसचा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. याचबरोबर गटारी नाहीत, पाणी जाण्यास वाटच नसल्याने पावसाळय़ात अनेक घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे तातडीने रस्ता व गटारी कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे करण्यात येत आहेत. मात्र, काही भागाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून वड्डर छावणी पहिला क्रॉस येथील रस्ता केला नाही. केवळ खोदाई करून रस्ता तसाच सोडला आहे. दोन्ही बाजूला गटारीदेखील नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. पावसाळय़ात गल्लीमध्ये गुडघाभर पाणी तुंबून राहाते. अनेकांच्या घरातदेखील पाणी शिरते.
निवडणुकीवेळी रस्ता गटारी करण्याचे आश्वासन दिले जाते. पण आता फंड नाही, असे सांगितले जाते. अनेकवेळा नगरसेवकांकडे जाऊन विनवणी केली. मात्र, निधी नाही तर आम्ही काय करू? अशी उत्तरे दिली जात आहेत, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. तातडीने हा रस्ता आणि गटारी कराव्यात अन्यथा पुढील निवडणुकीमध्ये त्यांना हिसका दाखवू, असा इशारादेखील देण्यात आला आहे.