ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील रिक्षावाले, टेम्पोवाले, फेरीवाले यांचंही जीवन आता बदललं पाहिजे. त्यासाठी लवकरच महामंडळ स्थापन करणार आहे. उदय सामंत आणि दादा भुसेंवर या महामंडळाची जबाबदारी असेल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावात केली.
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची बाळासाहेबांची शिकवण आहे. राज्याला न्याय मिळेल, अशी माझ्याकडून जनतेची अपेक्षा आहे. मी गद्दारी केली नाही. गद्दारी केली असती तर समर्थन मिळालं असतं का? धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही, पचला नाही. मी आज जाहीरपणे बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
मालेगावमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विविध योजना आणि प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी रिक्षावाले आणि फेरीवाल्यांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसेच या महामंडळाची जबाबदारी उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यावर असेल, असेही सांगितले.
हेही वाचा : राज्यपालांना आता कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय