अद्याप तारखेची घोषणा नाही : मतदान प्रक्रिया राबविण्याची शक्यता
बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक दि. 6 रोजी झाली. पण अद्याप स्थायी समिती निवडणुकांबाबत कोणतीच घोषणा झाली नाही. वास्तविक पाहता महापौर- उपमहापौर निवडणुकीनंतर लागलीच स्थायी समिती निवडणुका घेतल्या जातात. पण सध्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका घेण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या कौन्सिल विभागाने तयारी चालविली आहे. महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने महापौर-उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेवकांची निवड झाली आहे. महापौर निवडणूक होऊन पंधरा दिवस झाले तरी स्थायी समिती निवडणुका घेण्याबाबत कोणत्याच हालचाली नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर स्थायी समिती निवडणूक घेणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पण सध्या स्थायी समिती नसल्याने महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक घेण्याच्यादृष्टीने मनपा प्रशासनाने तयारी चालविली आहे. सध्या महापालिकेत भाजपकडे नगरसेवकांचे संख्याबळ अधिक असले तरी स्थायी समिती निवडणुकांवेळी विरोधी गटाने निवडणूक लढविल्यास मतदान प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सहकार्याने स्थायी समिती निवडणुका बिनविरोध घेतल्या जात होत्या. प्रत्येक स्थायी समितीमध्ये सात नगरसेवकांची निवड केली जाते. त्यामधून चेअरमन निवडले जातात. तर सात सदस्यांपैकी चार नगरसेवक सत्ताधारी गटाचे आणि विरोधी गटाच्या तीन नगरसेवकांची निवड स्थायी समिती निवडणुकीत केली जात असे. त्यामुळे 4:3 च्या फॉर्म्युल्यानुसार महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुका बिनविरोध केल्या जात असतं. मात्र सध्या महापालिकेत 3 वेगवेगळे गट असून भाजपकडे 35 नगरसेवक आहेत. त्यामुळे प्रत्येक समितीमध्ये 7 याप्रमाणे 28 नगरसेवकांची निवड स्थायी समितीवर होऊ शकते. पण प्रत्येक स्थायी समिती निवडणुकीसाठी विरोधी गटातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केल्यास मतदान प्रक्रिया घ्यावी लागण्याची शक्मयता आहे. त्यामुळे महापालिका कौन्सिल विभागाने निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचीदेखील तयारी चालविली आहे. निवडणुकीसाठी मतपेटी, बॅलेट पेपर तसेच उमेदवारी अर्ज अशी विविध तयारी करावी लागते. त्यामुळे कौन्सिल विभागाने स्थायी समिती निवडणुकीसाठी सर्व तयारी चालविली आहे. पण प्रादेशिक आयुक्तांनी अद्याप स्थायी समिती निवडणुकीची तारीख जाहीर केली नाही. पण त्यापूर्वी सर्व तयारी करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली आहे.
स्थायी समिती निवडणुकीनंतरच मनपाचा अर्थसंकल्प लेखा विभागाकडून तयारी सुरू
महापालिकेचा अर्थसंकल्प मागील चार वर्षांत प्रशासकांनी मंजूर केला होता. मात्र सभागृह अस्तित्वात आल्याने अर्थसंकल्प सभागृह बैठकीत सादर केले जाणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्यात लेखा विभाग व्यस्त आहे. मात्र स्थायी समिती निवडणुका झाल्यानंतरच अर्थसंकल्पासाठी विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला जातो. मात्र अलीकडेच महापौर-उपमहापौर निवडणूक झाली असून अद्याप स्थायी समिती निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे लेखा स्थायी समितीची स्थापना झाली नाही तर नियमानुसार अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या जातात. विविध संघटना, सामाजिक संस्था व चेंबर ऑफ कॉमर्स आदींच्या सूचनांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. लेखा विभागाकडून अर्थसंकल्प तयार केल्यानंतर लेखा स्थायी समिती बैठकीत चर्चा करून मंजुरी दिली जाते. त्यानंतर हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यात येतो. सभागृहात लेखा स्थायी समिती अध्यक्ष अर्थसंकल्प मांडतात. पण सध्या स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अर्थसंकल्प कोण मांडणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थायी समिती निवडणुका झाल्यानंतरच मनपाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या लेखा विभागाला स्थायी समिती निवडणुकांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अर्थसंकल्पासाठी महापालिकेतील विविध विभागांकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच अर्थसंकल्प तयार करण्यासाठी लेखा विभाग व्यस्त आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अर्थसंकल्पीय बैठक घेणे आवश्यक आहे. अन्यथा निवडणुकानंतरच अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. त्यामुळे स्थायी समिती निवडणूक लवकर घेण्याच्यादृष्टीने मनपा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे समजते.