आयोगाचे पथक 7 जानेवारीपासून राज्यांच्या दौऱ्यावर : पूर्वतयारीचा घेणार आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काउंटडाउन आता सुरू झाले आहे. निवडणूक आयोगाने याकरता सर्व तयारींचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 7 जानेवारीपासून लोकसभा निवडणुकीच्या तयारींचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या दौऱ्यांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आयोग स्वत:च्या दौऱ्याची सुरुवात तामिळनाडूतून करणार आहे. स्वत:च्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आयोग तामिळनाडूतील 39 आणि आंध्रप्रदेशातील 25 लोकसभा मतदारसंघ तसेच तेथील विधानसभेच्या 175 जागांवर निवडणुकीच्या तयारींचा आढावा घेणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप पांडे आणि अरुण गोयल हे लोकसभा निवडणुकीसाठी या राज्यांचा दौरा करणार आहेत. निवडणूक आयोगाचे पथक 7-10 जानेवारीपर्यंत या राज्यांच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यानंतर आयोगाचे पथक अन्य राज्यांमधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच ही निवडणूक 8 टप्प्यांमध्ये घेतली जाऊ शकते. यामुळे आयोगाकडून प्रशासकीय तयारीसह सुरक्षाव्यवस्थेसंबंधी विशेष पावले उचलली जाऊ शकतात.
मागील वर्षी अनेक राज्यांमध्ये शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यास आयोगाने यश मिळविले होते. आयोगानुसार मतदानाच्या टक्केवारीत वाढ, जवळपास शून्य पुनर्मतदान, विक्रमी जप्ती आणि निवडणुकीच्या काळातील हिंसेत मोठी घट ही त्याची मोठी कामगिरी आहे. 5 राज्यांमध्ये अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाने अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले होते.
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागांमध्ये शांततेत मतदान पार पडल्याने आयोगाचा आत्मविश्वास वाढला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच छत्तीसगडमधील 126 नक्षलप्रभावित गावांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे बदल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या संरचनात्मक, तांत्रिक, प्रशासकीय क्षमतानिर्मिती सुधारणांच्या स्वरुपात करण्यात आले होते.
गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे बदल दिसून आले आहेत. तसेच या निवडणुकांमध्ये ईव्हीएम विरोधात एकही तक्रार प्राप्त झाली नव्हती. मागील 11 विधानसभा निवडणुकांमध्ये हिंसेच्या घटनांचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. तर त्रिपुरात पहिल्यांदाच पुनर्मतदानाशिवाय शांततेत मतदान पार पडले आहे, नागालँडमध्येही अशीच स्थिती राहिली आहे