जि. प. प्रभागरचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका : आज सुनावणीची शक्यता
कोल्हापूर प्रतिनिधी
नवीन प्रभागरचनेनुसार जिल्हा परिषदेचे 9 गट तर पंचायत समितींचे 18 गण वाढणार आहेत. त्यामुळे जि. प. चे एकूण 76 गट आणि पंचायत समितींचे 152 गण होणार आहेत. गट आणि गणांची संख्या वाढली असली तरी अनैसर्गिकरित्या प्रभागरचना केल्याच्या इच्छुकांच्या तक्रारी असून याबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार असून त्यामध्ये न्यायालय कोणता निर्णय देणार यावर गुरुवारी होणाऱया आरक्षण सोडतीचे भवितव्य अवलंबून आहे.
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारुप प्रभागरचनेवर आमदार प्रकाश आवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे आक्षेप नोंदवला होता. पण ही हरकत फेटाळून लावून प्रारुप प्रभागरचना कायम केली. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात आमदार आवाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देऊन दोन आठवडय़ात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाला आदेश दिले. निवडणूक कार्यक्रमामध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असेही निर्देश दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन उच्च न्यायालयाने त्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागावी असे सूचित करून सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या 18 पैकी 5 याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये गुरुवारी (28 रोजी) आरक्षण सोडत होणार असल्यामुळे तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार बुधवारी (27 रोजी) सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायालयात काय निर्णय होणार यावर प्रभागरचनेचे आणि आरक्षण सोडतीचे भवितव्य अवलंबून आहे.
चक्राकार पद्धतीने होणार आरक्षण
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत गुरुवारी 11 वाजता शासकीय विश्रामगृहातील शाहू सास्कृतिक सभागृहामध्ये होणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती प्रवर्गाचे आरक्षण काढताना चक्राकार पद्धतीने उतरत्या क्रमाने काढले जाणार आहे. तर ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लकी ड्रॉ पद्धतीने काढले जाणार आहे.
ओबीसींना मिळणार 20 जागा
नवीन प्रभाग रचनेनुसार ओबीसी प्रवर्गाल 20 जागा मिळणार आहेत. यामध्ये 10 महिला आणि 10 पुरुष असे आरक्षण राहील. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 जागा असतील. त्यामध्ये 10 महिला व 10 पुरुष असतील. यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गातील 1 महिलेला संधी मिळणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 45 जागा असतील. त्यामध्ये 23 महिला व 22 पुरुष असतील.