अधीक्षक अभियंत्यासह पाच जणांना ठोठावली शिक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
भू-स्वाधीन कायद्याचा दुरुपयोग करणाऱया, लाच घेऊन कामे करणाऱया मलप्रभा डावा कालवा नवलतीर्थ यामधील अधीक्षक अभियंत्यांसह पाच जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बी. पद्मनाभ, कार्यकारी अभियंते एम. बी. कवदी, तांत्रिक साहाय्यक आनंद केशवराव मिरजी, कनि÷ अभियंते शुभा टी. आणि प्रकाश फकिराप्पा होसमनी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी हणमंत गदग्याप्पा मादर (रा. कगदाळ, ता. सौंदत्ती) यांच्या घरामध्ये या कालाव्यांमुळे पाणी येत होते. या कालव्याच्या परिसरातील अनेकांना या सर्वांनी नुकसानभरपाई दिली. मात्र हणमंत मादर यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली. इतरांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र मी लाच दिली नाही म्हणून मला नुकसानभरपाई दिली नाही, अशी तक्रार लोकायुक्तांकडे केली होती.
त्यानंतर तत्कालीन लोकायुक्तचे पोलीस उपायुक्त एच. जी. पाटील आणि जी. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणी सर्वांवर भा.दं.वि. 120 बी आणि 420 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी येथील चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये झाली. त्या ठिकाणी हे सर्व जण दोषी आढळले. त्यामुळे त्यांना दोन वर्षे साधी कैद आणि प्रत्येकी 70 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायाधीश मोहन प्रभू यांनी सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले.