एपीएमसी बाजारपेठेतील घटना : मालकाला भरपाई देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
विजेच्या धक्क्याने एपीएमसी बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यामुळे शेतकऱ्याला मोठा धक्का बसला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
धामणे एस. (बैलूर) येथील शेतकरी परशराम गोपाळ चौकुळकर हे शनिवारी एपीएमसी बाजारपेठेमध्ये आपली गाय घेऊन विक्रीसाठी आले होते. जनावरांच्या बाजारामध्ये गाय बांधली होती. दरम्यान शेजारी असणाऱ्या वीज ट्रान्स्फॉर्मरची पेटी होती. दरम्यान गायीचा या पेटीला धक्का लागला. दरम्यान सदर वीज पेटीमधून वीज प्रवाहित होऊन गाय जागीच गतप्राण झाली. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 60 हजाराचा फटका बसला आहे. घटनेची माहिती हेस्कॉमला देण्यात आली. हेस्कॉम अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र हे प्रकरण आपल्या व्याप्तीत येत नाही एपीएमसीकडे येते, असे सांगितले. यानंतर याची माहिती एपीएमसी अधिकाऱ्यांना देण्यात आली.
दरम्यान एपीएमसी अधिकारी रुद्रगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बाजारपेठेत विजेचा धक्का बसून मृत झालेल्या गायीची माहिती घेतली. आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.