खानापूर तालुका भाजपचे सभापती विश्वेश्वर हेगडे यांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
दुर्गम व मलनाड प्रदेश असल्याने खानापूर तालुक्याची व्याप्ती मोठी आहे. भौगोलिकतेचा विचार करता विरळ वस्ती असल्याने राज्य सरकारने जिल्हा पंचायत व तालुका पंचायत पुनर्रचना करताना जनसंख्येचा विचार न करता भौगोलिक सलगतेचा विचार करण्यात यावा व नव्याने 8 जिल्हा पंचायत व 27 तालुका पंचायतीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सभापती विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली.
बेळगाव जिल्हय़ातील खानापूर हा सर्वात मोठा तालुका. तसेच दुर्गम व अती पावसाचा प्रदेश असल्याने तालुक्याचा पश्चिम भाग हा पूर्णपणे दुर्गम भागात मोडतो. या ठिकाणी विरळ लोकवस्ती आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार लोकसंख्या घटक मानून ही पुनर्रचना करण्यात येत आहे.
सध्या 6 जि. पं. व 23 ता. पं.
खानापूर तालुक्यासाठी लोकसंख्या हा घटक बाजूलाच ठेवून मंगलोर, शिमोगा या भागात ज्या पद्धतीने जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीची रचना करण्यात आली आहे, त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यात पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यात सध्या सहा जिल्हा पंचायती व 23 तालुका पंचायती अस्तित्वात आहेत.
यामध्ये नव्याने जांबोटी, गर्लगुंजी, लोंढा, नंदगड, शिरोली, कक्केरी, गंदिगवाड व पारिश्वाड या जिल्हा पंचायती निर्माण करण्यात याव्यात. तसेच कणकुंबी, बैलूर, जांबोटी, निलावडे, निट्टूर, गर्लगुंजी, हलकर्णी, लोकोळी, शिरोली, गुंजी, करंबळ, लोंढा, नागरगाळी, कापोली, गोधोळी, नंदगड, बेकवाड, चापगाव, हलशी, गंदिगवाड, बिडी, कोडचवाड, इटगी, पारिश्वाड, हिरेहट्टीहोळी, कक्केरी व केरवाड अशा 27 तालुका पंचायतीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रमाणे पुनर्रचना झाल्यास विकासाचा समतोल साधता येणार आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत विश्वेश्वर हेगडे यांनी आपण याबाबत गांभीर्याने विचार करू, तसेच निवडणूक आयोगाला याबाबत सूचना करू, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, केएफडीसीचे सदस्य सुरेश देसाई, बाबुराव देसाई, अशोक देसाई यांनी बेंगळूर येथे भेट घेऊन निवेदन दिले.