प्रतिनिधी /फोंडा
कुठलीही सरकारी योजना व प्रकल्प समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही तोपर्यंत विकासाची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. समाजातील गरीब, दुर्बल व सर्वसामान्यांचा विचार त्यामागे असणे गरजेचे आहे. प्रशासन लोकांसाठी आहे व जनतेच्या प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग होऊन विकासाची फळे त्यांना चाखता आली पाहिजेत. हेच आपले राजकीय धोरण आहे. त्यामुळे कुठलाही प्रकल्प उभारताना त्याचे दूरगामी फायदे व भविष्याचे नियोजन असते. फोंडा शहराचा विकास साधताना केवळ मतदार संघ म्हणून आपण विचार करीत नाही. संपूर्ण तालुका व राज्यातील जनतेला त्याचा कसा लाभ होईल हा दृष्टीकोन त्यामागे असतो. फोंडा मतदार संघाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांनी साधलेला हा संवाद…!
फोंडय़ासाठी पुढील पाच वर्षांचे आपले धोरण काय आहे ?
फोंडा हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण व तालुका केंद्र असल्याने जनतेला डोळय़ासमोर ठेवून सर्व प्रकारच्या प्रशासकीय सेवा व सुविधा आपण फोंडय़ात उपलब्ध केलेल्या आहेत. फोंडा शहर व मतदारसंघात आज जे प्रकल्प दिसतात ते आपण आमदार, मंत्री व त्यापूर्वी मुख्यमंत्री असताना उभारले. प्रत्येक प्रकल्पामागे पुढील 25 ते 50 वर्षांचा विचार व नियोजन आहे. लोकसंख्या जसजशी वाढते तसतशा लोकांच्या गरजाही वाढू लागतात. त्यादृष्टीने उपलब्ध असलेल्या साधनसुविधांचा नियोजनपूर्वक विस्तार हेच आपले पुढील पाच वर्षांचे धोरण आहे.
फोंडा शहरातील वाहतुकीच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना आखता येतील ?
मुळातच फोंडा शहर हे क्षेत्रियदृष्टय़ा खूपच आटोपशीर आहे. चारही बाजूने डोंगर असल्याने शहरीकरणाच्या विस्ताराला फारसा वाव नाही. त्यामुळे आहे त्या जागेतच शहरातील वाहतूक व अन्य गोष्टींचे नियोजन करून मास्टरप्लॅन तयार करावा लागेल. त्याची पूर्वतयारी सुरु आहे. गेल्या काही वर्षांत फोंडा शहरामध्ये लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढली आहे. याउलट शहरातील रस्त्यांचा विस्तार करण्यास फारसा वाव नाही. अशा परिस्थितीत आहे त्या जागेतच नियोजन करणे भाग आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी झरेश्वर ते कपिलेश्वरी बगल रस्त्यापर्यंत नवीन मार्ग तयार करुन वाहतूक एका बाजूने वळविणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी आपण शहराच्या चारही बाजुंनी बगलरस्ते तयार केल्याने आज त्याचे फायदे लक्षात येतात. अन्यथा काय परिस्थिती ओढवली असती…!
फोंडय़ातील काँक्रिटच्या जंगलात, मोकळय़ा जागेचा प्रश्न कधी सुटणार ?
फोंडा शहर अत्यंत आटोपशीर असल्याने लोकांना मोकळा वेळ घालवण्यासाठी प्रशस्त असे उद्यान किंवा खुल्या जागेची आवश्यकता आहे. त्याचा विचार करुन क्रांती मैदानाचा अर्धा भाग जो सैन्य दलाच्या ताब्यात होता, तो आपण पालिकेला मिळवून दिला. मुख्यमंत्री असताना तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री व सैन्यदलाचे प्रमुख जनरल रॉड्रिगिस यांच्याशी यशस्वी बोलणी केल्याने सध्याच्या क्रांतीमैदानाची जागा फोंडा पालिकेला ताब्यात आली. त्या बदल्यात सैन्य दलाला कुर्टी येथे पर्यायी जागा दिलेली आहे. उर्वरित जागा उपलब्ध झाल्यास याठिकाणी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी बहुउद्देशीय उद्यान व वॉकिंग ट्रक उभारण्याचा आराखडा तयार आहे. हा प्रकल्प व्हावा यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
तिसऱया जिल्हय़ाची निर्मिती कधी होणार ?
राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला फोंडा तालुका तिसरा जिल्हा व्हावा यासाठी सन् 1991 पासून मुख्यमंत्री असताना आपला पाठपुरावा सुरु आहे. त्यावेळी अगरवाल या प्रशासकीय अधिकाऱयाची जिल्हय़ाचा आराखडा तयार करण्यासाठी नियुक्ती केली होती. त्यावेळचे शिक्षणमंत्री सुभाष शिरोडकर यांची जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून नेमणूक केली होती. हा जिल्हा प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचा फायदा केवळ फोंडा मतदारसंघालाच नव्हे तर शेजारील मडकई, शिरोडा, प्रियोळ या मतदारसंघाबरोबरच धारबांदोडा व सत्तरी तालुक्यालाही होणार आहे. फेंडा तालुक्यातील चारही मंत्र्यांशी त्यासंबंधी आपण बोलणी केलेली आहे. सावर्डे मतदारसंघातील आमदारही त्यासाठी अनुकूल आहेत. प्राधान्यक्रमाने आपण हा विषय विधानसभेत ठेवून तिसऱया जिल्हय़ासाठी आवश्यक ती पावले उचलणार आहे. येत्या पाच वर्षात फोंडा म्हणजेच ‘अंत्रुज जिल्हय़ा’ची निर्मिती हीच आपली प्राथमिकता व ध्येय असेल.
उपजिल्हा इस्पितळातील वैद्यकीय सुविधांबाबत जे आरोप होतात, त्यांना काय उत्तर द्याल ?
फोंडा तालुक्यात आपण आजवर जे जे प्रकल्प उभारले त्याला सुरुवातीला काही लोकांकडून विरोध झाला. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ हे त्याचे एक उदाहरण देता येईल. एवढे मोठे इस्पितळ फोंडय़ात हवेच कशाला असाही एक मतप्रवाह होता. मात्र आज त्याचे फायदे लोकांना कळून आले आहेत. गरीब व सामान्य जनतेला डोळय़ांसमोर ठेवून फोंडय़ात प्रशस्त व सुसज्ज असे इस्पितळ व्हावे हा आपला विचार होता. आज याठिकाणी दिवसाकाठी चारशे ते पाचशे लोक उपचारासाठी येतात. केवळ फोंडाच नव्हे तर शेजारच्या तालुक्यातील गरीब जनतेलाही त्यामुळे दिलासा मिळाला आहे. याठिकाणी सिटीस्कॅन, एमआरआय सारख्या सुविधा गरजेच्या आहेत. त्यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडलेला आहे. एखाद्या सेवाभावी संस्थेनेही पुढे येऊन ही उपकरणे उपलब्ध करून दिल्यास त्याचे स्वागतच आहे.
अजून कोणते विकासाचे प्रकल्प विचाराधीन आहेत ?
लोकप्रतिनिधी म्हणून आपण केवळ फोंडा मतदारसंघाचा विचार करीत नाही, तर संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या सुखसोयींना प्राधान्य देत आहे. फोंडा शहरातील राजीव गांधी कला मंदिर, क्रीडा प्रकल्प, स्वीमींग पूल, बगलरस्ते यासह एकाच ठिकाणी उभारलेल्या प्रशासकीय संकुलामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांना लाभ होत आहे. आज फोंडय़ात सर्व प्रकारचा विकास झालेला आहे. मात्र त्याबाबत आपण समाधानी नाही. भविष्याचा व पुढील पिढीचा विचार करून तिसऱया जिल्ह्य़ाच्या निर्मितीकडे आपण जे पाऊल टाकले आहे तो प्रत्यक्षात आल्यास खऱया अर्थाने प्रशासन जनतेच्या दारी येईल…!