प्रतिनिधी /बेळगाव
रुक्मिणीनगर येथे आश्रय योजनेंतर्गत घरे देण्यात आली आहेत. मात्र, आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रुक्मिणीनगरमधील मुलांसाठी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. पण मुलांसाठी चांगली योजना राबविण्यात येत आहे.
एरवी उच्चभ्रू वसाहतीतील खुल्या जागांचा तसेच उद्यानांचा विकास केला जातो. उद्यान आणि खेळांचे साहित्य बसवून मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. रुक्मिणीनगर आश्रय कॉलनीतील मुलांसाठी उद्यान व क्रीडा साहित्य बसविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. केवळ आश्रय घरांची उभारणी करून महापालिका प्रशासनाने येथील रहिवाशांच्या अडीअडचणी सोडविण्याकडे कानाडोळा केला होता. वसाहत निर्माण करण्याबरोबर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची होती. पण मनपा प्रशासनाने या जबाबदारीकडे कानाडोळा केला होता.
मात्र, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रुक्मिणीनगर आश्रय कॉलनीतील मुलांसाठी स्मार्ट उद्यान निर्माण केले आहे. या ठिकाणी खेळाचे साहित्य बसविले असून पाळणे, घसरगुंडी, आसन व्यवस्था व व्यायामाचे साहित्य उपलब्ध केले आहे. तसेच मॉर्निंग वॉकर्ससाठी वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्यात आले आहे. येथील काही साहित्य अद्यापही बसविण्यात आले नाही. मात्र, आश्रय कॉलनीतील मुलांसाठी राबविण्यात आलेला उपक्रम खूपच सुंदर आहे. या उद्यानात खेळण्याचा आनंद येथील मुले घेत आहेत. या उपक्रमाबद्दल स्मार्ट सिटीचे कौतुक केले जात आहे. याचप्रमाणे दुर्लक्षित असलेल्या उद्यानांचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने निधीची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.