गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात काही भागात परतीच्या पावसाचे संकट असून, नैर्त्रुत्य मान्सून निरोप घेत असताना गेल्या काही वर्षांपासून इथल्या लोकमानसाला परतीच्या आणि लहरी पर्जन्यवृष्टीचे असहय़कारक चटके बसत असल्याचे स्पष्ट होऊ लागलेले आहे. खरेतर नैत्य मान्सूनातल्या एकंदर पर्जन्यवृष्टीच्या प्रमाणावरती भारतातील कोटय़वधी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचे जगणे अवलंबून असून, पेयजल, सिंचनाच्या गरजेबरोबर इथल्या भूजलाची स्थिती वृद्धिंगत करण्यात योगदान होत असते. एकटय़ा नैर्त्रुत्य मान्सूनद्वारे भारतात सत्तर टक्के पर्जन्यवृष्टी वार्षिकरित्या होत असते आणि त्यावर शेती आणि बागायतीचे अस्तित्व अवलंबून असते. आपल्या कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा नैर्त्रुत्य मान्सून जीवनाधार ठरलेला आणि एकंदर विकासाचा दर निश्चित करण्यास या काळातली पर्जन्यवृष्टी उपयुक्त ठरलेली आहे. गेल्यावर्षी सरासरी 870 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु गेल्यावर्षी जुलैमध्ये महाराष्ट्रात तर सप्टेंबर महिन्यात गुजरातेत मुसळधार पर्जन्यवृष्टीने थैमान घातले. गेल्यावर्षी सिकंदराबाद आणि हैदाबाद या महानगरांना वारेमाप पर्जन्यवृष्टीबरोबर सांडपाणी आणि पावसाच्या एकंदर पाण्याचा निचरा करण्याच्या व्यवस्थेला नगर नियोजनाअभावी सुरुंग लावल्याकारणाने महापुराचा तडाखा बसला.
यंदा पर्जन्यवृष्टीच्या कहराने कर्नाटकाची राजधानी आणि भारताच्या औद्योगिक आणि माहिती-तंत्रज्ञानाचा आकर्षण बिंदू ठरलेल्या बंगळुरु महानगराची दैनावस्था प्रकर्षाने समोर आली. गटारे, सांडपाण्याचा निचरा, केरकचरा याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने झालेली बेपर्वाई आणि घिसाडघाई यामुळे जागतिक स्तरावर नावारुपास आलेल्या आणि प्रचंड लोकवस्तीच्या ताणाखाली अराजकपणे विस्तारत चाललेल्या महानगराच्या विकासाचा आराखडा किती कमकुवत आहे, ते समोर आले. हवामान बदल ही संकल्पना कपोलकल्पित असल्याचा डांगोरा पिटणाऱया आणि बेशिस्तीने मानवी विकासाच्या चालनेला प्राधान्य देणाऱया मंडळींचे एकंदर उपद्व्याप तकलादू असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आगामी काळात संपूर्ण जगभर हवामान बदलामुळे अवकाळी पर्जन्यवृष्टी, महापूर, दुष्काळ, शीतलहरी, उष्माघात आदी संकटांची मालिका वाढत जाणार असून, विकासाच्या आराखडय़ात जर आम्ही या बाबींकडे कानाडोळा केला तर आकस्मिकपणे होणाऱया पर्जन्यवृष्टीत बंगळुरुसारखी महाकाय महानगरांची दुरावस्था नित्याचीच बाब ठरणार आहे.
गोव्याच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया पणजीचे मार्गक्रमण महानगराच्या दिशेने करताना, इथला इतिहास, भूगोल त्याचप्रमाणे पर्यावरण आणि परिसंस्थेबरोबर आगामी काळात सागराच्या पाण्यात वाढत्या पातळीबरोबर हवामान बदलामुळे उद्भवणाऱया परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. जुन्या गोव्यातून ताळगावच्या एका वाडय़ावरती शंभर वर्षांपूर्वी प्रस्थापित झालेली पोर्तुगीज इंडियाची ही राजधानी, गोवा मुक्तीनंतर विकसित करण्यासाठी चुकीचा आराखडा राबविण्यात आला. एकेकाळी ताळगाव इथल्या नागाळीहून येणारी सांतिनेझची नदी आम्ही केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र सोडून एका गटारात परिवर्तीत केली. शहराची फुफ्फुसे असणाऱया खारफुटींचे सधन जंगल तोडून तेथे महाकाय इमारती उभारल्या. रस्ते, पूल आणि नागरी साधनसुविधा पुरविण्यासाठी पणजीतल्या पाणथळी, खारफुटीच्या जागा आम्ही मातीचे भराव घालून बुजवून टाकलेल्या आहेत. त्यामुळे काहीवेळ मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर पणजीतले रस्ते पाण्याखाली जाऊन, येथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचे प्रकार उद्भवत असतात. हे विस्तारत जाणारे महानगर अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱया समस्यांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे म्हणून ठोस प्रयत्न आणि उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेले आहे.
पणजी, बंगळुरु, हैदाबाद, चेन्नई, मुंबई या भारतातल्या विस्तारत चाललेल्या महानगराची स्थिती दिवसेंदिवस हवामान बदलाच्या समस्यांना सामोरे जाण्याच्यादृष्टीने दुर्बल होत चालली आहे. काही अपवाद वगळता पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ासाठी ही महानगरे परावलंबी असून हिवाळय़ात आणि उन्हाळय़ात पेयजलासाठी सुरू होणारा संघर्ष टोकाला गेलेला पाहायला मिळतो तर मुसळधार आणि अवकाळी पर्जन्यवृष्टीच्या माऱयाखाली ही महानगरे अल्पावधीत रस्ते पाण्याखाली गेल्याने दुरावस्थेला सामोरी जात असलेली पाहायला मिळतात. तौक्ते, गुलाबसारख्या वादळाचे चटके बसलेले असताना आणि आगामी काळात हवामान बदलामुळे उद्भवणाऱया संकटांची मालिका तीव्रपणे होणार असल्याची शक्यता असताना आम्ही ‘कशाला उद्याची बात?’ अशा मानसिकतेने वावरत आहोत आणि ढगफुटीसदृश होणाऱया पर्जन्यवृष्टीत गैरसोयींना सामोरे जाताना, नांगी टाकत आहोत. तापमान वाढ, लहरी हवामान यामुळे उद्भवणाऱया नैसर्गिक प्रकोपात वृद्धी होत असून, गेल्यावर्षी महापूर, भूस्खलन आणि वीज पडण्यामुळे देशातल्या 396 जिल्हय़ांत दोन हजारांच्या आसपास लोकांना मृत्यू आलेला आहे. हिमाचल प्रदेशात तर अशा दुर्घटनांमुळे 320 जणांना मृत्यू आलेला आहे. मध्य प्रदेशात वीज पडून 159 जणांना तर गुजरातमध्ये 69 जणांना मृत्यू आलेला आहे. तापमान वाढीचे संकट जगभर जाणवत असून, 2022 या वर्षातला मार्च महिना 121 वर्षांतला उष्णतेसंदर्भातला विक्रम गाठणारा ठरला. उष्माघातामुळे मृत्यूची संख्या दरवर्षी वाढत चाललेली असून, ही चिंता करण्याची स्थिती आहे.
कर्बवायुचे उत्सर्जन सध्या वाढत असल्याकारणाने महानगराची स्थिती खालावत चालली आहे. जीवाश्म इंधनांच्या वारेमाप वापरामुळे केरकचरा आणि तत्सम बाबी मोठय़ा प्रमाणात जाळल्याने प्रदुषणाची समस्या वाढत चालली आहे. हवा प्रदुषणामुळे शहरातल्या जनतेला नानातऱहेच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. प्रदुषणाच्या दृष्टीने आमच्या महानगरांनी नीचांक गाठलेला आहे. वाढत्या हवा प्रदुषणामुळेही अचानकपणे पर्जन्यवृष्टी होत असल्याचे मत काही शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे.
गेल्या बऱयाच वर्षांपासून नैर्त्रुत्य मान्सून निरोप घेताना अवकाळी आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीचे संकट आपल्यासाठी नवी बाब नसली तरी आजसुद्धा अशा पावसात त्रेधातिरपीट उडण्याची प्रकरणे नित्याचीच बाब ठरलेली. त्यामुळे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, अवकाळी पावसासारख्या संकटांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्याची मानसिकता आपल्या सरकारी यंत्रणेत आणि समाजात मूळ धरत नाही. त्यामुळेच जेव्हा एखाद्या जागी ढगफुटी झाली किंवा मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर त्याचे असहय़कारक चटके सर्वसामान्यांना सोसण्याची वेळ उद्भवत असते.
यंदा नैर्त्रुत्य मान्सून निरोप घेत असताना काही ठिकाणी वारंवार जी ढगफुटीसदृश मोठी पर्जन्यवृष्टी होऊन, मोसमी पिकांची नासाडी होत आहे, ती चिंतेची बाब आहे. हवामान बदल आणि तापमान वाढीच्या संकटामुळे वारंवार उद्भवणाऱया गैरसोयींना सामोरे जाण्याची आम्ही पूर्वतयारी करण्यास असमर्थ ठरलो तर त्याची कटूफळे वाटय़ाला येऊन नुकसान भोगण्याची वेळ येईल.
– राजेंद्र केरकर