भाजप प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांच्याकडून विरोधी पक्षनेत्यांचा निषेध
प्रतिनिधी /पणजी
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढलेल्या गोवा ग्राम संपूर्ण यात्रेसारख्या चांगल्या कार्यक्रमावर सुद्धा निरर्थक आणि निराधार आरोप करून टीका करण्याच्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वक्तव्याचा भाजप प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी निषेध व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांतून काँग्रेसची वैफल्यग्रस्तता दिसून येते, असे नाईक यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या गोवा ग्राम संपूर्ण यात्रेची सांगता करण्यानिमित्त शनिवारी राजभवनवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केरळचे राज्यपाल देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ही यात्रा राजकीय नव्हती. तरीही विरोधी पक्षनेत्याने आपल्या भाषणात राजकीय विधाने आणि सरकारवर बिनबुडाचे आरोप केले. एका विरोधी पक्षनेत्यासाठी हे निश्चितच शोभणारे नाही. यातून काँग्रेसचे नैराश्यच दिसून येते, असे ऍड. नाईक यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार जनतेला सुशासन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने त्यांनी घेतलेले उल्लेखनीय लोकहितवादी निर्णय तसेच प्रगती आणि विकासाच्या महत्त्वपूर्ण वाटचालीची संपूर्ण जनता साक्षीदार आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी भाजपला पुन्हा सत्तास्थानी आणण्यात योगदान दिले. त्यातून डॉ. सावंत पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
राज्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने लोकाभिमुख निर्णय आणि धोरणांद्वारे लोककेंद्रित प्रशासन देण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गोमंतकीय आज ठामपणे भाजपच्या पाठिशी राहिले आहेत, असे ऍड. नाईक यांनी म्हटले आहे.
अशावेळी राजभवनवर आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्याने केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे तर आहेतच, त्यातून काँग्रेसची वैफल्यग्रस्तताही दर्शवतात, असे प्रवक्ते ऍड. नाईक यांनी म्हटले आहे.