शेतकऱयांनी पीक विमा भरावा, संकटकाळात आधार, केंद्र सरकारकडून पिकांना संरक्षण
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना जारी करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना केंद्र सरकारकडून संरक्षण देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती, कीड आणि इतर संकटकाळात या विम्यातून शेतकऱयांना भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱयांनी खरीप हंगामातील पिकांवर विमा उतरून घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
यंदा जिल्हय़ात 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, मका, बटाटा, कापूस आदी पिकांची पेरणी आणि लागवड झाली आहे. मागील दोन वर्षात महापुरामुळे पिकांना मोठा फटका बसला होता. नदीकिनारी तर पूर्ण पिकेच पाण्याखाली गेली होती. अशा परिस्थितीत विमा शेतकऱयांना आधार ठरणार आहे.
कृषी खात्याने चालू खरीप हंगामात पीक विमा योजना राबविली आहे. ही योजना शेतकऱयांसाठी ऐच्छिक असली तरी नैसर्गिक आपत्ती, कीड व अन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱयांना आर्थिक आधार देणारी आहे. त्यामुळे शेतकऱयांनी पीक विमा योजना घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
खरीप हंगामातील पिकाबरोबर रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा, मसूर आणि उन्हाळी भुईमूग, बटाटा पिकांनादेखील या योजनेंतर्गत संरक्षण मिळणार आहे. अतिवृष्टी, पूर, जलमय क्षेत्र, कीड, रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, वादळ आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. दरम्यान, पीक काढणीवेळी देखील अतिपावसामुळे पिकांना फटका बसतो. अशा परिस्थितीत शेतकऱयांना नुकसान भरपाईसाठी ही विमा योजना साहाय्यकारी ठरणार आहे.
संकटकाळात विमा फायदेशीर
खरिप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. शिवाय तीन वाहनेदेखील याबाबत जागृती करत आहेत. शेतकऱयांनी जवळच्या कृषी सेवा केंद्र, तालुका कृषी खात्यात संपर्क साधून पीक विमा भरावा. नैसर्गिक आणि इतर संकटांमुळे पिकांना फटका बसतो. अशा परिस्थितीत शेतकऱयांना हा विमा फायदेशीर ठरणारा आहे.
-शिवनगौडा पाटील, उपनिर्देशक कृषी खाते