गांधी जयंती, दसऱयानिमित्त प्रवासी संख्येत वाढ : परिवहनला दिलासा
प्रतिनिधी / बेळगाव
गांधी जयंती आणि दसऱयाच्या सुटीमुळे ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध मार्गांवर अतिरिक्त बस धावत आहेत. तसेच दसऱयासाठी परजिल्हय़ातून आणि परराज्यातून येणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनच्या महसुलात वाढ झाली आहे.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परिवहनला मोठा फटका बसला होता. सण-उत्सवातदेखील बसेस जाग्यावर थांबून होत्या. त्यामुळे महसूलही थांबला होता. मात्र यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात होत असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. येत्या रविवारी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि बुधवार दि. 5 रोजी दसरोत्सव आहे. त्यामुळे येत्या शनिवारपासून सुटी आहे. तर 3 तारखेपासून शाळांना सुटय़ा पडणार आहेत. त्यामुळे बाहेरून आपल्या मूळ गावी परतणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. दरम्यान प्रवाशांच्या सोयीखातर बेंगळूर, मंगळूर, हैदराबाद, पणजी, पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जादा बस धावत आहेत.
महसूल वाढविण्यासाठी धडपड
सण-उत्सव काळात परिवहन जादा बस सोडून महसूल वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. परिवहन आर्थिक अडचणीत असल्याने अतिरिक्त बससेवा पुरवून महसूल वाढविण्यासाठी धडपड करीत आहे. दसरा उत्सवासाठी प्रवाशांची ये-जा सुरू असते. याकरिता विविध मार्गांवर जादा बस सोडण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. दसरा आणि गांधी जयंती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात असल्याने लागोपाठ सुटय़ा आहेत. त्यामुळे गावी परतणाऱया कुटुंबीयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ पहायला मिळत आहे.
बेंगळूरसाठी विशेष वातानुकूलित बस दुपारी 12 वाजता बेंगळूरकडे धावत आहे. या वातानुकूलित बसलाही प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. याचबरोबर पणजी, मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद येथील अतिरिक्त बससेवेलाही प्रवासी वाढत आहेत.