दिवाळीच्या सुट्टीनंतर एका गावातल्या शाळेमध्ये ‘दहावीच्या परीक्षेचा अभ्यास कसा करावा’ यावर वर्ग घेत असताना “दिवाळीत काय केले?’’ हा प्रश्न विचारून मुलांना बोलते केले. खरे खरे उत्तर देण्याचे आवाहन केल्यावर, “दंगा केला’’, “मामाच्या गावाला गेलो’’, “फटाके उडवले’’, “फराळ केला’’ अशी उत्तरे आली. “चकल्या कोणाला आवडतात?’’ या माझ्या प्रश्नावर बऱयाच मुला-मुलींनी हात वर केला. “चकल्या कोणत्या पिठाच्या करतात?’’ या प्रश्नावर फक्त मुलींचे हात वर होते. मुले काही प्रयत्न करण्यासही तयार नव्हती. यानंतर “बेसनाचे लाडू कोणत्या पिठाचे करतात?’’ या प्रश्नाचे उत्तर देण्यास मुले तयार नव्हती. मुलांना उत्तर येत नाही, हे बघून मुली उत्साहाने प्रश्नाचे उत्तरे देण्यास तयार झाल्या. एकूणच मुलांचा स्वयंपाकघरात वावर कमी असल्याचे समजले. म्हणूनच फक्त मुलांसाठी एक प्रश्न विचारला, “आपल्या घरी चार पाहुणे आले आहेत, चहा करायचा आहे, त्याची कृती मुलांपैकी कोण सांगणार?’’ मोजक्मया मुलांचे हात वर दिसले. त्यातल्या एका मुलाने कृती सांगितली, “एक भांडे घ्यायचे, त्यामध्ये चार ग्लास पाणी घालायचे, त्यात चार चमचे चहा पावडर आणि दीड वाटी साखर घालायची आणि भांडे गॅसवर अर्धा तास उकळत ठेवायचे. अर्ध्या तासानंतर चहा गाळण्यातून गाळून पाहुण्यांना द्यायचा.’’ या उत्तरावर वर्गातील सर्व मुली लोटपोट होऊन हसू लागल्या.
यानंतर इतर चार शाळांमध्ये हाच प्रश्न विचारल्यावर थोडय़ा-फार फरकाने अशीच उत्तरे मिळाली. याचे कारण मुले स्वयंपाकघरामध्ये फक्त जेवणा-खाण्यासाठीच जातात. आपला मुलगा स्वयंपाकघरात काही करतो आहे हे समजताच बऱयाच मातोश्री विलक्षण नाराज होतात. मुलगा आणि मुलगी वाढवण्यात भेदाभेद समाजामध्ये होत असतोच पण त्याची पायाभरणी घरामध्येच होत असते. पाहुणे घरात आल्यावर त्याना पाणी देण्यास घरातील मुली-स्त्रियाच पुढे येतात. केर काढण्यास मुलांना शिकवले जात नाही. स्वयंपाकघरात कोणत्या डब्यामध्ये कोणती डाळ आहे याची मुलांना माहिती नसते. भूक लागली असल्यास, “काय पाहिजे ते मला सांग, मी डब्यातून काढून देते’’ अशी उत्तरे घरातील स्त्रियांकडून आल्यामुळे स्वयंपाकघरात न डोकावण्याचे संस्कार लहानपणापासून मुलांवर होतात. खरे तर विज्ञान शिकण्याची सुरुवात स्वयंपाकघरातून होत असते. कणिक मळणे, आंबोळी-डोसा-चकलीचे पीठ भिजवणे अशी कामे आठ-नऊ वर्षाच्या मुलांना वडिलांनी शिकवल्यास मुले स्वयंपाक शिकतातच, त्याचबरोबर पिठामध्ये किती पाणी घातल्यानंतर त्याची प्रक्रिया कशी होते हे निरीक्षण करण्याचे बाळकडू घरामध्येच मिळते. त्यामध्ये कमी जास्त पाणी घालून बघण्याचे प्रयोग मुलांना करू द्यावे. त्यानंतर चहा करणे, दुध तापवणे, दुध उतू जाण्यापूर्वी गॅस बंद करणे याचे शिक्षण घरामध्ये घेतल्यास निरीक्षणशक्ती वाढते.
शास्त्र या विषयामध्ये औत्सुक्मय निर्माण व्हावे यासाठी तो विषय शिकवताना “दही कसे लावतात?’’ हा प्रश्न विचारतो. या प्रश्नाचे उत्तर मुली देऊ शकतात परंतु दहावीमध्ये शिकणारी मुले याचे उत्तर देऊ शकत नाहीत. “दुधामध्ये थोडे ताक-दही घालून ढवळून फ्रीजमध्ये रात्रभर ठेवल्यास सकाळी दही लागते’’ असे उत्तर वेगवेगळय़ा शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिले आहे. त्यावर रेफ्रिजरेटरचे काम काय, दही लागते याचा अर्थ दुधामध्ये बॅक्टेरिया पसरतात/प्रसवतात अशा चर्चेमधून त्यांना शास्त्र या विषयाची गोडी लागते, हे मी अनुभवले आहे. परंतु घरामध्ये असे शास्त्राचे प्रयोग मुलांना करता येत नाहीत. विशेष म्हणजे पालक स्वयंपाक याकडे एक कला आणि शास्त्र या दृष्टीकोनातून बघत नाहीत, हे जाणवले. दही, योगर्ट, पनीर यामधील फरक समजावून सांगितल्यावर त्यांना अनेक प्रश्न पडतात. याविषयी शास्त्राच्या क्रमिक पुस्तकात धडा आहे परंतु मुलांना घरच्या स्वयंपाकघरात त्याचे प्रयोग करून बघता येत नाहीत त्यामुळेच त्याना शास्त्र हा विषय प्रयोगशाळेत शिकण्याचा असतो असा गैरसमज होतो आणि त्या विषयाची गोडी लागत नाही.
सांगली जिह्यातील जत तालुक्मयातली कुल्लाळवाडी जिल्हा परिषद शाळेत 2016 पासून भाकरी करण्याची स्पर्धा भक्तराज गर्जे या शिक्षकांच्या कल्पनेतून सुरु झाली आहे. ज्यामध्ये अलीकडेच पाचवीत शिकणाऱया एका विद्यार्थ्याचा पहिला नंबर आला. दुष्काळी पट्टय़ातील या गावातल्या बहुतांश मुलांचे पालक सहा महिने ऊसतोड मजुरीसाठी स्थलांतर करतात. “माझी भाकरी’’ या शालेय उपक्रमामुळे मुले स्वावलंबी होऊन गावातच थांबली आहेत. स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी मुलांना त्यांच्या पालकांकडून भाकरी करण्यास विरोध झाला होता परंतु आता मुले स्वावलंबी झालेली बघून पालकांना त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. स्पर्धेमुळे अनेक मुलांनी भाकरीबरोबर काही भाज्या करणे, चहा करणे शिकून घेतले. मुलांना स्वयंपाक शिकवण्यास विरोध फक्त गावामध्येच असतो असे नव्हे. शहरातील अनेक पालक आजही स्वयंपाकघरातील कामे मुलांना सांगत नाहीत, मुलींकडून करून घेतात. त्यामुळे भेदभावामुळे अन्याय झाल्याची भावना मुलींमध्ये लहानपणापासून वाढीस लागते.
स्वयंपाक ही एक कला आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग मुले करावयास शिकली तर कलात्मक दृष्टीकोनही वाढीस लागतो. साचेबद्ध पद्धतीने स्वयंपाक करावयास शिकवल्यास प्रयोग करण्याची वृत्ती थांबते. स्वयंपाक शिकता शिकता इतिहास शिकता येतो. भारतातील वेगवेगळय़ा राज्यातील पदार्थ आपण खात असतो. पंजाबी छोले, बंगाली मिठाई, गुजराथी खाकरा, मुंबईची पाव-भाजी, ढाब्यावरील विविध पदार्थ, बिर्याणी-पुलाव यामधला फरक, महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा प्रांतातील खाण्याच्या सवयी आणि ते करण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातले उप्पीट आणि दाक्षिणात्य उपमा यातला फरक समजताच त्या चवीचे वैविध्य आणि त्यामागील भौगोलिक कारणे समजू शकतात. मंडईमधून स्वतः आणलेल्या भाज्या मुले आवडीने खाऊ शकतात. साखर आणि गुळ यामधील फरक स्वयंपाक केल्याशिवाय फक्त पुस्तके वाचून समजणे अवघड जाईल. युद्धावर जाताना महायुद्धातील सैनिकांसाठी बटाटा हे सोयीस्कर अन्न का होते, त्याबद्दल स्वयंपाकघरातील कृतीमुळेच खात्री पटेल. स्वयंपाक शिकलेल्या मुलांना आरोग्यासाठी कोणते अन्न चांगले आहे यावर भाषण देण्याची गरज नसते. कोणताही स्वयंपाक करण्यासाठी साहित्य जमा करण्याचे नियोजन आवश्यक असते, त्यामुळे नियोजनाचे महत्त्व स्वयंपाक येणाऱया मुलांना वेगळे पटवून द्यावे लागत नाही.
स्वयंपाक शिकणे जीवशास्त्र-इतिहास-भूगोल-कला शिकण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेच, शिवाय मुले मोठी झाल्यावर, कॉलेजमध्ये परगावी प्रवेश घेतल्यास, नोकरीच्या निमित्ताने एकटे रहावे लागल्यास स्वयंपाक शिकल्याचा उपयोग होत असतो. शिक्षणासाठी बाहेरगावी राहण्याची वेळ आल्यानंतर सर्वात मोठी पंचाईत मुलांची होत असते कारण त्यांना स्वतःचा चहासुद्धा करता येत नसतो. त्यामुळे मंडईमधून भाजी स्वतः निवडून आणणे, दरमहा घरी आवश्यक असणारे किराणा सामान आणणे आणि रोजच्या जेवणातले भात-भाजी-चपाती करणे याचे प्रशिक्षण पालकांनी सर्व मुलांना दहावीपूर्वी देणे आवश्यक आहे, कारण स्वयंपाक हे आवश्यक जीवन-कौशल्य आहे. “If you give a man a fish, you feed him for a day. If you teach a man to fish, you feed him for a lifetime’’ या उक्तीनुसार स्वयंपाकघरात किमान चहा-भात-भाज्या-चपात्या असे मोजके पदार्थ कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः करण्याची कुवत निर्माण करण्याचे काम पालकच करू शकतात.
-सुहास किर्लोस्कर