अडणे, आंबावली, कावरे, मळकर्णे, बार्से, पाडी भागांत पीक घेण्याचे प्रमाण जास्त
एकनाथ गावकर/ केपे
आज मिरचीच्या अनेक जाती असल्या व मोठय़ा प्रमाणात त्यांचे सर्वत्र उत्पन्न घेत असले, तरी ग्रामीण भागांतील मिरचीला बाजारात भरपूर मागणी आहे. काणकोणातील खोलच्या मिरचीला तर राज्यस्तरीय दर्जा देण्यात आला असून ग्रामीण भागांत लागवड करण्यात येणारी पावसाळी मिरची असो वा त्यानंतर पिकविली जाणारी ‘पोरसाची मिरची’ असो, दोन्हींना मोठी मागणी आहे.
केपे तालुक्याचा विचार केला, तर जास्त भाग हा डोगराळ असल्याने आणि जास्त लोकवस्ती ही ग्रामीण भागांत असल्यामुळे या भागांत इतर पिके घेण्याबरोबर आजही मोठय़ा प्रमाणात मिरची लागवड केली जात आहे. पावसाच्या दिवसांत डोंगरमाथ्यावर मिरची व इतर भाज्यांची जास्त लागवड केली जाते. पाऊस संपला की, पाण्याची सोय असलेल्या शेतीच्या जागी मिरची लागवड केलेली पाहायला मिळते. केपे तालुक्यात 40 हेक्टरहून जास्त जागेत मिरची लागवड केली जाते. प्रामुख्याने अडणे, आंबावली, कावरे, बार्से, मळकर्णे, पाडी व इतर भागांत मिरची जास्त लावली जाते.
पोरसातली मिरची म्हणून ओळखल्या जाणाऱया मिरचीचा दरही प्रति किलो सुमारे 1100-1200 रु. इतका आहे. मात्र प्रामुख्याने ज्या भागांत जास्त मिरची लागवड केली जाते त्यापैकी बहुतेक गावांत सरकारतर्फे कोणतीच पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. गावातील पारंपरिक ओहोळ, नदी, विहीर यांच्या पाण्याच्या आधारे ही लागवड केली जाते.
हिरव्या मिरचीची 15 हेक्टर क्षेत्रात लागवड
पारंपरिक मिरचीबरोबर हिरव्या मिरचीलाही मागणी असल्याने अडणे, आंबावली, पिर्ला, बाळ्ळी व इतर भागांत मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते असून पेपे तालुक्यात सुमारे 15 हेक्टर क्षेत्रात हिरव्या मिरचीची लागवड केली जात असल्याचा आढळून आले आहे. तसेच या मिरचीचा दर प्रति किलो 42 रु इतका असून एकूण 15 टनांपेक्षा जास्त उत्पन्न घेतले जाते. याकरिता सितारा व अलिया अशी दोन प्रकारची बियाणे वापरली जातात, तर बाळ्ळी व नेत्रावळी या द़ोन ठिकाणी मिरची खरेद्री केंद्रे आहेत .
मिरचीबरोबर भाज्यांचे पीक
मिरची लागवडीत चिटकी मिटकी, गड्डे, वाल, तांबडी भाजी, मुळा अशा अनेक भाज्यांची लागवड केली जात असून खास करून आंबावली, अडणे या भागांत अशी लागवड केली जाते. यंदा पेपेच्या विभागीय कृषी कार्यालयातून विविध भाज्यांची 40 किलो इतकी बियाणे शेतकऱयांनी भाज्यांचे उत्पन्न घेण्याकरिता नेली असल्याची माहिती मिळाली आहे.
पारंपरिक जलस्रोतांच्या आधारे लागवड
मात्र केपे तालुक्यातील ज्या भागांत साळावली धरणाचे पाणी कालव्यांद्वारे शेतकऱयांना उपलब्ध आहे असे बहुतेक भाग शहरी भागांजवळ असल्याने तेथे पाण्याची सोय, शेतजमीन असतानाही मिरची वा इतर भाज्यांची लागवड केलेली दिसत नाही. याउलट सरकारकडून कोणतीच पाण्याची सोय करण्यात आलेली नसताना कावरेपिर्ला, अडणे, बाळ्ळी, पाडी, बार्से या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात पारंपरिक जलस्रोतांच्या आधारे मिरची व भाज्यांची लागवड केली जात आहे.
हिरवी मिरची व इतर भाज्यांची बियाणे सरकारकडून लोकांना उपलब्ध केली जात असल्याने त्यांच्या लागवडीत काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. केपे तालुक्यातील हिरव्या मिरचीच्या वाढलेल्या उत्पन्नावरून हे दिसून येते. यासंबंधी केपे कृषी कार्यालयाचे अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी सागितले की, पूर्वी पारंपरिक मिरचीची लागवड केली जात होती. आता त्यात भर पडली असून हिरव्या मिरचीचीही लागवड केली जात आहे. त्याचे दर व विक्री केंद्रही जवळ असल्याने अनेक जण आता हिरव्या मिरचीची लागवड मोठय़ा प्रमाणात करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.