प्रतिनिधी/ चिपळूण
कोळकेवाडी धरणाचे वक्र दरवाजे उघडून त्याद्वारे अवजल सोडण्याची दुसरी चाचणी 25 ऑगस्ट रोजी रोजी घेण्यात येणार आहे. पूरनियंत्रणाचा एक भाग म्हणून ही चाचणी असून गुरूवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत धरणाच्या वक्रद्वारे 10 हजार क्युसेस पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे धरण ते पेढांबे पूल दरम्यान पाणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होऊ नये म्हणून या भागात प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. परिसरातील गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.
यापूर्वी धरणातून 18 ऑगस्टला सकाळी 10 ते 12.30 या कालावधीत धरणाचे वक्रद्वारे उघडून करण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत 2400 क्युसेस पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडण्यात आले. यावेळी नाल्याची वहन क्षमता, वाशिष्ठी नदीत पाणीपातळीत होणारी वाढ तपासण्यात आली. आता गुरूवारी पुन्हा तब्बल 10 हजार क्युसेसचा विसर्ग करून आवश्यक त्या तपासण्या पुन्हा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, पाणी सोडले जाणार असल्याने नदीपात्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. या कालावधीत धरणाखालील कोळकेवाडी, नागावे, अलोरे या नजीकच्या गावातील नागरिकांनी बोलादवाडी नाल्यात जाऊ नये. तसेच गुरे-ढोरे नालापात्रात जाणार नाहीत, याची खबरदारी घेऊन जीवित वा वित्तहानी टाळावी. तसेच वाशिष्ठी नदी काठावरील पेढांबे, खडपोली, पिंपळी खुर्द, पिंपळी बुद्रुक, सती, खेर्डी आदी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी आणि नगरपालिका हद्दीतील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना कोयना सिंचन विभाग, कोयनानगर तसेच तहसील कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
दरम्यान, 18 रोजी करण्यात आलेल्या चाचणीवेळी पाणी पाहण्यासाठी लक्षणीय गर्दी उसळली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेता गुरूवारी धरण ते पेढांबे पूल दरम्यानच्या बोलादवाडी नाला परिसरात तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत कोळकेवाडी धरणातून 10 हजार क्युसेस पाणी सोडून घेण्यात येणाऱया चाचणीमुळे कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये म्हणून 25 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत पेढांबे-अलोरे-शिरगाव या मार्गावरील पेढांबे ब्रीज-नागावे ब्रीज या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात येणार आहे. तसेच या मार्गावरील खासगी व सरकारी वाहतूक पेढांबे-पिंपळी बु.-मुंढे-शिरगाव या मार्गावरून वळविण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.