पुणे / प्रतिनिधी :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘असनी’ चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीजवळ पोहोचले आहे. हे वादळ पुन्हा उत्तर-उत्तरपूर्वेकडे वळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 12 मेपर्यंत हे वादळ विशाखापट्टणजवळील समुद्रातच सामावणार आहे. त्यामुळे या वादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
हे वादळ सध्या पूर्व किनारपट्टीच्या जवळ आहे. 120 किमी वेगाने वारे वाहत असून, काही भागात पाऊसही पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंत हे वादळ काकीनाडा ते विशाखापट्टणमच्या दिशेने प्रवास करेल. गुरूवारपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल. मात्र, यावेळी समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज (ता. 10) आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यासह, मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनवर परिणाम नाही
सध्या बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, या वादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 जूनलाच मान्सून केरळात दाखल होईल. महाराष्ट्रात त्याचे आगमन होण्यासाठी बराच आवधी आहे.