शेकडो घरांचे, पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान : अनेक गावे अंधारात
पाटगाव/प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यात झालेल्या चक्रीवादळात शेकडो घरांचे नुकसान झाले असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्री तब्बल दोन तास वादळी वाऱयासह पाऊस झाला. यात घरासह काजू, आंबा, फणस या पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक गावात विजेचे खांब कोलमडून पडल्याने निम्मा तालुका अंधारात आहे. या वादळाचा तडाखा ममदापूर, कडगाव, नवले, शेळोली, दोनवडे, नांदोली, तिरवडे, पाचर्डे आदी गावांना मोठ्य़ा प्रमाणात बसला.
वादळामुळे परिसरातील विद्युतपुरवठा बंद झाला असून मंगळवारी दिवसभर महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. काजूच्या मोठ मोठ्य़ा बागा उध्वस्त झाल्याने या भागातील शेतकरी हतबल झाला आहे. मोठ्य़ा प्रमाणात आर्थिक हानी झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मंगळवारी सकाळी नुकसानग्रस्त गावांना तहसीलदार आश्विनी वरुटे यांनी भेट दिली. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. दिवसभर महसूल विभागाचे कर्मचारी गावोगावी पंचनामे करत होते. ममदापूर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे यानिमित्ताने शेकडो भावीक रात्री कीर्तनासाठी एकत्र जमले होते. याचा फटकाही या हरिनाम सप्ताहालाही बसला. संपूर्ण मंडप वादळाने उडून गेला. परिणामी सगळीकडे धावपळ उडाली. येथील जयवंत बजरंग सावंत, विठ्ठल कृष्णा देसाई, प्रकाश शंकर देसाई, पाचर्डे गावातील दत्तात्रय पाटील, हरी पाटील, सुभाष सोळंकी यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. पाटगाव-कडगाव परिसरात सकाळपासूनच सर्वजण उकाड्य़ाने हैराण झाले असतानाच दुपारनंतर काहीकाळ ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे सुटल्यानंतर आठच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर यांनी गावांना भेटी दिल्या.