पुणे / प्रतिनिधी :
दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर तसेच लगतच्या दक्षिण अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले. या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, आज त्याचे ‘मोचा’ वादळात रुपांतर होईल. तसेच सुरुवातीला हे क्षेत्र उत्तर-उत्तरपश्चिमेकडे त्यानंतर वळसा घालत उत्तर पूर्वेकडे बांग्लादेश-म्यानमारच्या किनारपट्टीकडे जाईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला.
दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे हे या वर्षातील पहिलेच वादळ आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अंदमान-निकोबार बेटे तसेच समुद्रात जोरदार पाऊस होत आहे. या भागातील समुद्रदेखील खवळलेला आहे. बुधवारी या क्षेत्राचे वादळात रुपांतर होईल, सुरुवातीला हे वादळ उत्तर-उत्तरपश्चिमेकडे प्रवास करेल. गुरुवारनंतर मात्र हे वादळ वळसा घेऊन उत्तर-पूर्वेकडे बांग्लादेश-म्यानमारकडे मार्गक्रमण करेल. त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेला धोका टळलेला आहे.
समुद्र खवळणार, पावसाचाही मारा
या वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण-पूर्व, पूर्व-मध्य, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात 13 मेपर्यंत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. या काळात वाऱ्याचा वेग 110 किमी प्रतितास पोहोचणार असल्याने समुद्राची स्थिती खवळलेली राहील. मच्छीमारांना या भागात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात मुसळधारेचा इशारा
9 ते 11 मेच्या कालावधीत तामिळनाडू, पाँडेचरी, कराईकल, कर्नाटक किनारपट्टीवर मंगळवारी, तर केरळ व महेच्या भागात 11 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे. याबरोबरच त्यानंतरही तुरळक पावसाचा अंदाज या भागात आहे.
पूर्वोत्तर भारतात जोरदार
अरुणाचल प्रदेश, आसाम व मेघालयच्या भागात पुढील पाच दिवस पाऊस राहील. नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुराच्या भागात 13 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे.
कोकणात उष्मा वाढणार
बिहार तसेच पश्चिम बंगालमध्ये 13 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत देशांतील बहुतांश भागातील कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच गुजरात व कोकणात उष्म्यात वाढ होणार असून, सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.