पुणे / प्रतिनिधी :
Cyclone Sitarang will move towards Bangladesh बंगालच्या उपसागरात निर्माण होऊ पाहणाऱ्या चक्री वादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नसून, हे चक्री वादळ ‘पाडवा-भाऊबीज’ नंतर (26 ला) ओरिसाच्या किनारपट्टीला बगल देऊन प. बंगाल व बांगलादेशकडे निघून जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
खुळे म्हणाले, मागील 3 दिवसाच्या (17,18,19) जोरदार पावसानंतर खान्देश व उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी तुरळक ठिकाणीच अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असून, शनिवार दि.22 ऑक्टोबर पासून मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाशसहित उघडीपीची अपेक्षा आहे. मुंबईसह कोकणात मात्र रविवार दि.23 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
परतीच्या पावसाचा राज्यात अजून 2 दिवस मुक्काम राहील. दिवाळीत मात्र उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांचा सध्याचा खरीप पीककाढणी व रब्बी बीज रोवणीचा निर्णायक कालावधी असून, त्यांना अजूनही दोन दिवस (21 पर्यंत )थांबावे लागेल. दूर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या दापोली समोरील ते लक्षद्विपच्या प. किनारपट्टी दरम्यान असलेल्या पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाच्या पट्टा (आस) या आणि तर वातावरणीय प्रणाल्याबरोबर सध्या इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानेही सितरंग वादळाविषयी माहिती दिली असून, 25 ऑक्टोबरपर्यंत हे वादळ पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टीकडे सरकेल, असे म्हटले आहे.