मुंबई \ ऑनलाईन टीम
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईपासून तौत्के चक्रीवादळ १२० किमी अंतरावर घोंगावत आहे. या वादळाचा महाराष्ट्रातील किनारपट्टीला प्रचंड फटका बसत आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला.
तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या वाहतूकीला देखील बसला असून वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मारर्गावर झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर कोसळली. यामुळे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकादरम्यान फांदी कोसळली आहे. यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर खबरदारी म्हणून मुंबई विमानतळ आणि मोनोरेल सेवा बंद करण्यात आली आहे.