आमदार तुमच्या दारी : पक्ष संघटनामुळे सातव्यांदा विजय
अनिलकुमार शिंदे /वास्को
दाबोळी मतदारसंघात वीज, पाणी, रस्त्यांचे डांबरीकरण, भुयारी गटार, कचरा विल्हेवाट अशा विविध समस्या सुटलेल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी कामे सुरूच आहेत. अनेक विकास प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. काही नवीन प्रकल्प उभे राहणार आहेत असे स्पष्ट करताना दाबोळीचे आमदार व राज्याचे वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी नाका ते वेर्णाच्या नाक्यापर्यंत आताच्या चौपदरी महामार्गावरच उड्डाण पूल उभारण्याचे ध्येय आपण ठेवलेले आहे. तसेच नवेवाडे व शांतीनगरला जोडणारा नवीन रेल्वे उड्डाण पुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजूरी दिलेली आहे. दाबोळी ते वेर्णापर्यंतच्या साधारण दहा किलो मिटर अंतराच्या उड्डाण पुलासाठी चारशे कोटी रूपये खर्च करण्यात येईल अशी माहिती त्यांनी तरूण भारतला दिली.
मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की आमचे काम निवडणुकी पुरतेच नसते. निवडणुक असो किंवा नसो आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपले काम सतत चालू असते. प्रत्येक दिवशी काही ना काही उपक्रम दाबोळीत असतो. दाबोळी मतदारसंघात आतापर्यंत बरीच विकास कामे झालेली आहेत. दाबोळीतील कोणताही भाग असा राहिलेला नाही ज्याला विकासाचा स्पर्श झालेला नाही. वीज पाण्याची समस्या जवळजवळ सुटलेली आहे. नवीन ट्रान्सफोर्मर उभारण्यात आलेले आहेत. तसेच आणखी व्यवस्था करण्यात येत आहे. पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आलेल्या आहेत व उभारण्यात येत आहे. भुयारी गटाराची सोयसुध्दा बहुतेक भागात पोहाचलेली आहे. नवीन काही भागातही ही सोय पोहोचवण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. कचरा विल्हेवाटीची समस्या पूर्ण सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन महिन्यात चिखलीत कचऱयापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे. चिखलीतील पंचायत घराच्या सौदर्यीकरणाअंतर्गंत या घरासाठी नवीन प्रवेशव्दार तसेच हॉलचे वातानुकुलीकरण करण्यात येणार आहे. पुढील काही महिन्यात चिखलीच्या नाक्यावरील बालोद्यानाच्या विकासाचे काम सुरू होणार आहे. दाबोळीतील आकर्षण वाटावे असे स्वरूप या उद्योनाला देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. विमानतळ मार्गावरील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानाचे नुतनीकरण पूर्ण झालेले आहे. त्या ठिकाणी नवीन क्रीडा संकुल उभारण्यात आलेले आहे. विविध क्रीडा सुविधा या ठिकाणी असतील. लवकरच हे मैदान उपलब्ध होईल. बोगमाळोत फुटबॉल मैदान तयार होणार आहे. दाबोळीत क्रीडा मैदानासाठी पायाभरणी करण्यात आलेली आहे. बोगमाळो पंचायतीला नवीन पंचायत घर लाभणार आहे. बोगमाळो किनाऱयावर तात्पुरत्या स्वरूपाची शौचालय व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. कायम स्वरूपी व्यवस्था करण्याचे काम चालू आहे. दाबोळी विमानतळासमोर पार्किंगसाठी जमीन उपलब्ध करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी नवीन उड्डाण पुलाचेही काम सुरू आहे. या सोयीमुळे या नाक्याशेजारी होणाऱया वाहतुक कोंडीचाही प्रश्न सुटणार आहे असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
वाडेतील तळय़ाच्या स्वच्छतेचे काम करणार
वाडेतील तळय़ाचे सौदर्यीकरण करण्यात आल्याने या भागात एक आकर्षण व लोकांसाठी चांगली सोय निर्माण झाली. परंतु केवळ सौदर्यीकरण करून भागणार नाही. त्या तळय़ातील पाण्याची स्वच्छताही व्हायला हवी. तळय़ाच्या स्वच्छतेसाठी ते पाणी खेळते राहायला हवे. तळे आणि समुद्राला जोडणारा जो नाला आहे. त्याची स्वच्छता आधी व्हायला हवी. तळय़ाच्या सौदर्यीकरणाअंतर्गंत दुसऱया टप्प्यात हे काम करण्यात येणार होते. मात्र, काहींनी दुसऱया टप्प्यातील काम रोखले. याचा परीणाम सर्व लोकांना सहन करावा लागला. आता दुसऱया टप्प्यातील हे काम आपण पुन्हा हाती घेणार आहे. चिखलीतील जॉगर्स पार्कच्या दुसऱया टप्प्यातील कामाला सुरवात झालेली आहे. आणखी सुविधा आता या पार्कमध्ये उपलब्ध होतील. याच पार्कच्यासमोर नवीन मैदान तयार करण्यात येणार आहे. महिला भवनही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.
दाबोळी ते वेर्णापर्यंतच्या चौपदरी महामार्गावर उड्डाण पुल
या विविध विकास प्रकल्पांबरोबरच काही महत्वकांक्षी प्रकल्पही दाबोळीत दिसणार आहेत. हा प्रमुख प्रकल्प म्हणजे दाबोळी नाका ते वेर्णा नाकापर्यंतच्या चौपदरी महामार्गावर उड्डाण पुल उभारण्यात येणार आहे. सुमारे दहा किलो मिटर अंतराच्या या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी चारशे कोटी खर्च करण्यात येणार असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील भुपृष्ठ वाहतुक मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजूरी दिलेली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय आपण बाळगलेले असून तो पूर्ण होणारच आहे. या प्रकल्पाबरोबरच आणखी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे नवेवाडे व शांतीनगर या भागांना जोडणारा नवीन रेल्वे उड्डाण पुल. हा पुल उभारण्यासाठी रेल्वेमंत्रालयाने मंजूरी दिलेली आहे असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. भविष्यात मुरगाव बंदरातील उद्योगही वाढणार आहे. त्यामुळे वाहतुकीतही वाढ होणार आहे. भविष्याचा विचार करूनच दाबोळी ते वेर्णापर्यंत उड्डाण पुल उभारण्यात येणार असून या रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या सुटणार आहे.
दाबोळीत पक्ष संघटन मजबूत असल्यानेच माझा विजय
दाबोळीतील लोक यापूर्वीही माझ्याबरोबरच होते आणि आताही आहेत. आपण आतापर्यंत सातवेळा निवडणुक जिंकलेली आहे. कुठ्ठाळीत चार वेळा तर दाबोळीत तीन वेळा जिंकलेलो आहे. यावेळी काही बडय़ा हस्थीनी आपल्याविरूध्द छुप्या कारवाया केल्या. आपल्याला पाडायचा पुरेपूर प्रयत्न केला. यात आपल्या पक्षातीलसुध्दा काहींचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या विजयी मतांची आघाडी थोडी कमी झाली. तसे पाहता एरवी पडणाऱया मतांपेक्षा यंदा आपल्याला पाचशे मते जास्तच पडली. आपल्याविरूध्द छुप्या कारवायां करणाऱयांचे कष्ट पूर्ण वाया गेले. आपल्याविरूध्द जे कोण कारवाया करीत होते ते आता उघडे पडलेले आहे. सिध्दही झालेले आहे. आघाडी कमी झाली तरी दीड हजारांचे मताधिक्क आपल्याला मिळालेच. दाबोळीत आपल्या पक्षाचे संघटन मजबूत असल्यानेच आपल्याला हा विजय मिळवता आला असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
वास्को मतदारसंघाच्या विकासासाठीही आमदार दाजी साळकर यांना साथ देईन
दाबोळीचा विकास झालेला आहे आणि पुढेही होत राहिल. परंतु वास्को मतदारसंघ विकासात मागे राहिल्याने या मतदारसंघाच्या विकासासाठीही मी आमदार दाजी साळकर यांना साथ देणार आहे. आमदार साळकर हे माझे चांगले मित्र असून विकासासाठी आम्ही दोघेही एकत्रच असणार असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.