कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रात्री उशिरा आपल्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना हटवले. डच्चू दिलेल्यांमध्ये परेश अधिकारी, सौमेन महापात्रा, हुमायून कबीर आणि रत्ना डे नाग यांचा समावेश आहे. घोटाळा-भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे आल्यानंतर ममतांनी मंत्रिमंडळाला बुधवारी नवा साज दिला आहे. त्यांनी नऊ जणांना शपथ देऊन मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले आहे.
नव्या 9 जणांना सामावून घेतल्यानंतर चौघांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी पार्थ चटर्जी यांना बडतर्फ केल्यानंतर परेश अधिकारी यांना हटवण्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. परेश अधिकारी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी या घोटाळय़ात पार्थ चटर्जी यांना अटक झाल्यानंतर ममतांनी 28 जुलै रोजी त्यांची मंत्रिमंडळातून आणि पक्षसंघटनेतून हकालपट्टी केली होती.