एका बाजुला फेरीवाले तर दुसरीकडे बैठे व्यापारी, पादचाऱ्यांना ये-जा करणे बनले मुश्कील
बेळगाव : बाजारपेठेत बैठे व्यापारी आणि फेरीवाल्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रस्त्यावरून ये-जा करणे देखील कठिण बनले आहे. दुचाकी किंवा अन्य वाहनधारकांना बाजारपेठेतून जाण्यासाठी कसरत करावी लागते. काहीवेळा गर्दीमुळे नरगुंदकर भावे चौकात पादचाऱ्यांना देखील रस्ता मिळत नाही. एकीकडे फेरीवाले तर दुसरीकडे बैठे व्यापाऱ्यांमुळे नागरिकांनी जायचे कसे, अशी समस्या भेडसावत आहे. शहरात व्यावसायिकांची संख्या वाढत असून, शासनाकडूनच फेरीवाले आणि बैठे व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र याचा फटका शहरवासियांना बसत आहे. फेरीवाले आणि बैठे व्यापाऱ्यांना योजनांचा लाभ देण्यापूर्वी त्यांच्यासाठी हॉकर्स झोन निर्माण करणे बंधनकारक आहे. पण हॉकर्स झोन निर्माण करण्यापूर्वीच फेरीवाल्यांना व बैठे व्यापाऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेकडून भू भाडे देखील वसूल केले जात आहे. भू भाड्याकरीता कंत्राटदारांनी प्रत्येक रस्त्यावर तसेच अडचणीच्या ठिकाणी बैठे व्यापारी आणि फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. याचा फटका शहरवासियांना बसत आहे. बाजारपेठेत नागरिक आल्यानंतरच फेरीवाले आणि व्यावसायिकांचा व्यवसाय चालणार याचा विसर व्यावसायिकांना पडला आहे.
शहरातील गर्दी वाढली असून, वाहनांची संख्या आणि फेरीवाल्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे. बाजारपेठेतील अडचणी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक बाजारपेठेत येण्यास टाळाटाळ करीत आहेत. रस्त्याशेजारी फेरीवाले आणि बैठे व्यापाऱ्यांनी ठाण मांडले असून, वाहनांना अडचण निर्माण होत आहे. रहदारी पोलिसांनी मार्किंग केलेल्या पांढऱ्या पट्टीच्या आत बसण्याची सूचना व्यापाऱ्यांना केली होती. पण याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. फेरीवाले आणि बैठे व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलिसांकडून कारवाई केली जाते. ही कारवाई बंद झाल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे व्यापारी रस्त्यावर अतिक्रमण करत आहेत. विशेषत: गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, चावी मार्केट आदींसह विविध परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. कडोलकर गल्लीतील वाहतूक कोंडी समस्येवर तोडगा काढण्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले, पण रस्त्यावर एका बाजुला वाहनांच्या रांगा तर दुसऱ्या बाजुला फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. याठिकाणी काही व्यापारी रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. फेरीवाले आणि व्यावसायिकांसाठी रस्त्याचे रूंदीकरण केले का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहर आणि उपनगरातील फेरीवाल्यांना तसेच बैठे व्यावसायिकांना शिस्त लावण्यात यावी तसेच वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना अडचण होणाऱ्या परिसरातील फेरीवाल्यांना व व्यापाऱ्यांना पर्यायी जागेत स्थलांतर करावे, अशी मागणी होत आहे.