यात्रा, लग्न समारंभांना प्रारंभ : विविध मार्गांवर बस सुरळीत, प्रवाशांच्या संख्येत वाढ, परिवहनला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
यात्रा, उत्सव व शाळांना सुटी पडल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच आंबेडकर, महावीर जयंतीनिमित्त ये-जा करणाऱयांची संख्या वाढल्याने परिवहनच्या महसुलात वाढ झाली आहे. विविध मार्गांवर बसेस सुरळीत झाल्याने परिवहनचा महसूल वाढला आहे. दैनंदिन बस वाहतुकीतून परिवहनला 60 ते 65 लाखांचा महसूल प्राप्त होत आहे.
मागील दोन वर्षांत लॉकडाऊन, कर्मचाऱयांचे आंदोलन यामुळे परिवहनला प्रचंड फटका बसला. बस जाग्यावर थांबून राहिल्याने उत्पन्नही पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहे. दरम्यान, राज्य सरकार परिवहनच्या मदतीला धावून आले होते. त्यानंतर आता बससेवा आंतरराज्य मार्गांवरदेखील सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे आता हळूहळू महसुलात वाढ होऊन दैनंदिन महसूल 65 लाखांपर्यंत गेला आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे पर्यटनस्थळे बंद होती. मात्र आता पर्यटनस्थळेही सुरू झाल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विविध पर्यटनस्थळांकडे बस धावत असल्याने महसूल पूर्वपदावर येत आहे. शाळांना सुटी पडल्यामुळे कुटुंबासह बाहेर फिरणाऱयांची संख्या वाढली आहे. शिवाय मुंबई, बेंगळूर, पुणे येथून ये-जा करणाऱयांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उत्पन्नही वाढत आहे.
लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना सुरुवात झाल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. शिवाय गोवा व महाराष्ट्रातून प्रवासी ये-जा करू लागले आहेत. त्यामुळे परराज्यातून येणाऱयांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे परराज्यातून मिळणाऱया महसुलातही वाढ झाली आहे.
परिवहनच्या उत्पन्नात वाढ
सण, यात्रा आणि लग्न समारंभांना प्रारंभ झाल्याने ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नही हळूहळू वाढत आहे. विविध ठिकाणी बस धावत आहेत. तसेच महाराष्ट्र आणि गोव्यातदेखील बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रक बेळगाव)