ऑनलाईन टीम / रायपूर :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे प्रदेश सरकारने 9 ते 19 एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
सरकारने हा निर्णय एका दिवसात झालेली उच्चांकी संख्या म्हणजेच 2821 नवे रुग्ण आढळून आल्याने घेतला आहे. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 26 लोकांचा बळी घेतला आहे. राजधानी रायपूरमध्ये पाहिला मृत्यू 29 मे रोजी झाला होता.
जिल्हाधिकारी एस. भरती दासन यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान सर्व जिल्ह्यांच्या सर्व सीमा बंद असणार आहेत. दूध वितरित करण्यासाठी देखील वेळेची मर्यादा आखून दिली आहे. तसेच पर्यटन स्थळे, दारूची दुकाने, शासकीय आणि खाजगी कार्यालये बंद ठेवली जाणार आहेत. सरकारकडे परवानगी घेण्यात आलेल्या परीक्षाच होणार असून अन्य परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन दरम्यान ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार :
- रायपूरमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडे ई पास असणे आवश्यक आहे.
- कोरोनाची लस घेण्यासाठी ये – जा करण्यास नागरिकांना परवानगी असेल.
- सर्व धार्मिक स्थळे बंद असणार.
- आपतकालीन स्थितीत केवळ फोर व्हिलर, तसेच रिक्षेत ड्रायव्हर सह केवळ तीनच लोकांना प्रवासाची परवानगी असणार आहे.
- केवळ दूध, पेट्रोल आणि मेडिकल सेवा सुरू राहील.
- कारण नसताना वाहनाने फिरताना दिसल्यास 15 दिवसांसाठी वाहन जप्त केले जाईल.
- मिडीया कर्मचारी घरूनच काम करतील, आवश्यकतेनुसर ऑफिसला यावे लागल्यास सोबत आयडी कार्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरू असेल.
- दुधाची दुकाने बंद ठेवली जातील. तर दूध वितरित करण्यासाठी सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 5 ते 6.30 ही वेळ ठरवून देण्यात आली आहे.