समाजावर अत्याचारांमुळे दुःखी असल्याचा दावा ः काँग्रेस सरकारच्या भूमिकेमुळे निराश
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानच्या जालोरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीत दलित मुलाचा मृत्यू झाल्यावर बारां-अटरूचे काँग्रेस आमदार पानाचंद मेघवाल यांनी राजीनामा दिला आहे. मेघवाल यांनी स्वतःच्या राजीनाम्याचे पत्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत तसेच विधानसभा अध्यक्षांना पाठविले आहे. शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे दुखावलो गेल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीवर 24 तासांनंतरही कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतरच राजीनामा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेघवाल हे काँग्रेसच्या तिकिटावर बारां-अटरू या मतदारसंघात दोनवेळा विजयी झाले आहेत.
भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यावरही राजस्थानात दलित आणि वंचितांवर सातत्याने होत असलेल्या अत्याचारांमुळे माझे मन दुःखावले गेले आहे. माझा समाज ज्याप्रकारचा यातना सहन करत आहे, त्याचे दुःख शब्दांमध्ये व्यक्त केले जाऊ शकत नसल्याचे मेघवाल यांनी म्हटले आहे.
राज्यात दलित आणि वंचितांना मडक्यातून पाणी पिण्याच्या नावावर तर कुठे मिशी ठेवल्याने यातान देऊन ठार केले जातेय. चौकशीच्या नावाखाली फाइल्स इकडून-तिकडे फिरवत न्यायप्रक्रिया रखडविली जात आहे. मागील काही वर्षांपासून दलितांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे मेघवाल यांनी म्हटले आहे.
राज्यघटनेत समानतेचा अधिकार आहे, परंतु दलितांचे रक्षण करणारा कुणीच नाही. आम्ही आमच्या समाजाच्या अधिकारांचे रक्षण करण्यास आणि न्याय मिळवून देण्यास अपयशी ठरू लागलो तर आम्हाला पदांवर कायम राहण्याचा कुठलाच अधिकार नाही असे मेघवाल म्हणाले.