संसार उघडय़ावर, भरपाई मिळवून देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जोरदार पावसामुळे जाफरवाडी येथील परशराम बसवंत पाटील यांचे राहते घर कोसळून नुकसान झाले आहे. शिवाय संसार उघडय़ावर पडल्याने निवाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
मागील आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसामुळे घराची पडझड झाली आहे. या पावसामुळे जाफरवाडी येथील एका शेतकऱयाचे घर कोसळल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय निवारा कोठे घ्यावा आणि जनावरे कोठे बांधावीत, असा प्रश्न या शेतकऱयांसमोर निर्माण झाला आहे.
यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर कोसळल्याने शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.
जीवनावश्यक वस्तू व जनावरे शेजारील घरात हलविण्यात आली आहेत. पडलेल्या घरांची तातडीने पाहणी करून या शेतकऱयाला तातडीने नवीन घर मंजूर करावे, अशी मागणी होत आहे. वादळी पावसाने अनेक कष्टकरी शेतकऱयांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पडझड झालेल्या घरांची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.