प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात मागच्या आठवडय़ापासून सतत पडणाऱया मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पाळोळे, पाटणे, भाटपाल या भागांत काही घरांची पडझड होणे, पैंगीण-हाददुरिग भागात रस्त्यावर पाणी येऊन वाहतुकीवर परिणाम होणे असे प्रकार घडलेले आहेत. काहींच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्याचप्रमाणे तळपण, गालजीबाग नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली असून शेती-बागायतींमध्ये पाणी शिरले आहे. काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांना बरोबर घेऊन या सर्व जागांची पाहणी केली. त्याचबरोबर चापोली धरणाला भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले. पावसामुळे झालेल्या हानीत सुदैवाने जीवितहानी झालेली नसली, तरी शेती-बागायतींचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचा अहवाल सरकारला पाठविला जाईल, अशी माहिती मामलेदार कोरगावकर यांनी दिली.