आनंदनगर येथील घटना, सुदैवाने रहिवासी सुखरूप, परतीच्या पावसाचा रत्नागिरीत ठिकठिकाणी तडाखा
प्रतिनिधी/रत्नागिरी
परतीच्या पावसाचा रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी तडाखा बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी दुपारनंतर रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. शहरानजीकच्या जाकीमिऱ्या येथे वीज कोसळून 4 घरातील वीज उपकरणे जळून तसेच इमारतीचेही हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी राज्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले काही दिवस पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असले तरी पाऊस पुन्हा बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
30 सप्टेंबर रोजी कोकणातही मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुपारनंतर पडलेल्या या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. रत्नागिरी शहरानजीकच्या जाकीमिऱ्या येथे सायंकाळी वीज कोसळली. यामध्ये आनंदनगर येथील प्रभाकर जाधव, राजू जाधव, प्रिया जाधव, सुजाता जाधव यांच्या घरातील इर्न्व्हटर, फ्रिज आदी उपकरणे जळून नुकसान झाले आहे. घराशेजारच्या शौचालयाचेही वीज पडल्याने नुकसान झाले आहे. या घटनेत नागरिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
साखरप्यात ढगफुटीसदृश पाऊस
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे शुक्रवारी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. ओढ्याने रौद्र रूप धारण केल्याने साखरपा देवडे मार्गावरील वाहतुक अर्धा तास ठप्प होती. शुक्रवारी सुमारे तासभर विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यावेळी भडकंबा आणि भोवडे गावाला जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून मोठ्या वेगात पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.